रविंद्र जाडेजा आणि भुवनेश्वर कुमारने मधल्या फळीत केलेल्या संयमी फलंदाजीच्या जोरावर भारताने बांगलादेशचा अंतिम फेरीत ३ गडी राखून पराभव केला. आशिया चषकाचं भारताचं हे सातवं विजेतेपद ठरलं. नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या भारताने बांगलादेशला २२२ धावांमध्ये गुंडाळलं. मात्र धावसंख्येचा पाठलाग करताना भारताचा डाव मधल्या षटकांमध्ये काहीसा गडबडला. रोहित आणि शिखर या सलामीच्या जोडीने भारताला आक्रमक सुरुवात करुन दिली. मात्र शिखर व रायडू माघारी परतल्यानंतर रोहितने दिनेश कार्तिकसोबत छोटेखानी भागीदारी करत संघाचा डाव सावरला. मात्र रोहित माघारी परतल्यानंतर धोनी आणि कार्तिक जोडीला धावांची गती राखता आली नाही. चौथ्या विकेटसाठी धोनी-कार्तिक जोडीने अर्धशतकी भागीदारी केली खरी, मात्र यादरम्यान दोन्ही खेळाडूंनी प्रचंड चेंडू खर्ची घातले. याचकाळात बांगलादेशच्या गोलंदाजांनी भारतावर दबाव आणून सामन्यात दणक्यात पुनरागमन केलं. दिनेश कार्तिक, महेंद्रसिंह धोनीला माघारी धाडण्यात यश आल्यानंतर केदार जाधवही दुखापतीमुळे मैदानाबाहेर गेल्यामुळे भारताच्या चिंतेत भर पडली. मात्र रविंद्र जाडेजाने भुवनेश्वर कुमारच्या साथीने किल्ला लढवत भारताचं आव्हान सामन्यात कायम राखलं. विजयासाठी ११ धावांची आवश्यकता असताना रविंद्र जाडेजा माघारी परतला. यानंतर ४९ व्या षटकात मुस्तफिजूरच्या गोलंदाजीवर भुवनेश्वर माघारी परतल्यामुळे भारताच्या अडचणीत आणखी भर पडली. मात्र यानंतर केदार जाधवने मैदानात येऊन कुलदीप यादवच्या साथीने भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. सामन्यात शतकी खेळी करणाऱ्या बांगलादेशच्या लिटन दासला सामनावीराचा तर मालिकेत धावांचा रतीब घालणाऱ्या शिखर धवनला मालिकावीराचा किताब देऊन गौरवण्यात आलं. तत्पूर्वी सलामीवीर लिटन दासने झळकावलेलं शतक आणि मधल्या फळीत सौम्या सरकारने केलेल्या ३३ धावांच्या जोरावर बांगलादेशने अंतिम सामन्यात २२२ धावांपर्यंत मजल मारली. चांगली सुरुवात करुनही मधल्या फळीतल्या फलंदाजांनी हाराकिरी केल्यामुळे बांगलादेशचा संघ सामन्यात मोठी धावसंख्या उभारु शकला नाही. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय रोहित शर्माच्या चांगलाच अंगलट आला. लिटन दास आणि मेहदी हसन यांनी पहिल्या विकेटसाठी १२० धावांची भागीदारी केली. भारताच्या एकाही गोलंदाजाला ही जोडी फोडण्यात अपयश आलं, त्यामुळे रोहित शर्माने अखेर केदार जाधवच्या हाती चेंडू सोपवला. केदारनेही रोहितचा विश्वास सार्थ ठरवत बांगलादेशची पहिली जोडी फोडली. यानंतर बांगलादेशच्या डावाची घसरगुंडी उडाली. एकामागोमाग एक फलंदाज मोठे फटके खेळण्याच्या नादात विकेट टाकत माघारी परतायला लागले. याचा फायदा घेत भारताने सामन्यात जोरदार पुनरागमन केलं. मधल्या फळीत सौम्या सरकार-कर्णधार मश्रफी मोर्तझाने फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांची डाळ जास्तवेळ टिकू शकली नाही. एका डावात बांगलादेशचे तब्बल ३ फलंदाज धावबाद होऊन माघारी परतले. गोलंदाजीत भारताकडून कुलदीप यादवने ३, तर केदार जाधवने २ बळी घेतले.