१८ ऑगस्ट ते २ सप्टेंबर दरम्यान इंडोनेशियाच्या जकार्ता शहरात होणाऱ्या आशियाई खेळांसाठी हॉकी इंडियाने आज आपल्या पुरुष संघाची घोषणा केलेली आहे. २०१४ साली भारताने आशियाई खेळांमध्ये अंतिम फेरीत पाकिस्तानवर मात करुन सुवर्णपदकाची कमाई केली होती, यंदाही भारतीय संघाकडून अशाच कामगिरीची अपेक्षा केली जाणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीप्रमाणे आशियाई खेळांसाठीही गोलकिपर पी. आर. श्रीजेशकडे भारतीय संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलेलं आहे. नेदरलँडमध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीत श्रीजेशने भक्कम बचाव करत सर्वोत्तम गोलकिपरचा मान पटकावला होता.

भारतीय संघासाठी सकारात्मक बाब म्हणजे ड्रॅगफ्लिकर रुपिंदरपाल सिंह आणि आघाडीच्या फळीत आकाशदीप सिंहचं पुनरागमन. रुपिंदरपालच्या अनुपस्थितीत गेल्या काही सामन्यांमध्ये भारताला पेनल्टी कॉर्नरवर अनेकदा अडचणींचा सामना करावा लागला होता, त्यामुळे यंदाच्या आशियाई खेळांमध्ये भारत कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

आशियाई खेळांसाठी असा असेल भारताचा हॉकी संघ – 

गोलकिपर – पी. आर. श्रीजेश (कर्णधार), क्रिशन बहादूर पाठक

बचावफळी – हरमनप्रीत सिंह, वरुण कुमार, बिरेंद्र लाक्रा, सुरेंद्र कुमार, रुपिंदरपाल सिंह, अमित रोहिदास

मधली फळी – मनप्रीत सिंह, चिंगलीन साना (उप-कर्णधार), सिमरनजीत सिंह, सरदार सिंह, विवेक सागर प्रसाद

आघाडीची फळी – एस. व्ही. सुनील, मनदीप सिंह, आकाशदीप सिंह, ललित कुमार उपाध्याय, दिलप्रीत सिंह