आजचा दिवस भारतीय क्रीडाप्रेमींसाठी मिश्र स्वरूपाचा ठरला. भारताला हॉकीमध्ये मलेशियाकडून पराभूत व्हावे लागले. तर त्यानंतर झालेल्या ऍथलेटिक्स स्पर्धेत भारताला चांगले यश मिळाले. भारताच्या महिला संघाने ४ x ४०० मीटर रिलेमध्ये तर जीन्सन जॉन्सनने १५०० मीटर धावणे या प्रकारात भारताला सुवर्ण कमाई करून दिली. याशिवाय, पुरुष संघाने ४ x ४०० मीटर रिलेमध्ये भारताला रौप्यपदक पटकावले. तर थाळीफेकमध्ये भारताच्या सीमा पुनियाला कांस्यपदक आणि १५०० मी. शर्यत (महिला) मध्ये चित्रा उन्नीकृष्णनला कांस्यपदक पटकावले. या स्पर्धेत भारतीय पुरुष हॉकी संघाचं आव्हान संपुष्टात आले. साखळी फेरीत आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर निर्विवाद वर्चस्व गाजवलेल्या भारतीय संघाला मलेशियाने पेनल्टी शूटआऊटवर ७-६ ने मात केली. या पराभवासह २०२० टोकियो ऑलिम्पीकमध्ये थेट प्रवेश करण्याचं भारतीय हॉकी संघाचं स्वप्न धुळीस मिळालं आहे. अटीतटीच्या सामन्यात दोन्ही संघांनी निर्धारित वेळेत २-२ अशी बरोबरी साधली. यामुळे सामना शूटआऊटवर नेण्यात आला. यावेळी मलेशियाचा गोलकिपर कुमार सुब्रमण्यमने एस. व्ही. सुुनीलचा फटका अडवत आपल्या संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. साखळी फेरीत आपल्या सर्व प्रतिस्पर्ध्यांवर निर्विवाद वर्चस्व गाजवणाऱ्या भारतीय संघाला उपांत्य फेरीत मलेशियाकडून चांगलीच कडवी टक्कर मिळाली. मलेशियाच्या अभेद्य बचाव भेदणं भारताच्या आघाडीच्या फळीतल्या खेळाडूंना जमलं नाही. पहिल्या दोन सत्रांमध्ये मिळून भारताला पेनल्टी कॉर्नरवर गोल करण्याच्या ५ पेक्षा जास्त संधी चालून आल्या होत्या, मात्र एकाही संधीचं गोलमध्ये रुपांतर करणं भारतीयांना जमलं नाही. मलेशियाचे खेळाडूही पहिल्या सत्रात गोल करण्यात अपयशी ठरले. मलेशियाचा गोलकिपर एस.कुमार आणि भारताचा पी. आर. श्रीजेश यांनी मध्यांतरापर्यंत चोख कामगिरी बजावली. मध्यांतरानंतर तिसऱ्या सत्रात अखेर भारताने गोलपोस्टवरची कोंडी फोडली. ३३ व्या मिनीटाला भारताचा युवा ड्रॅगफ्लिकर हरमनप्रीत सिंहने रवी कुमारचा बचाव भेदून भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली. ५ प्रयत्नांनंतर सहाव्या प्रयत्नात गोल करण्यात भारतीय संघाला यश आलं. यानंतर मलेशियाच्या संघाने जोरदार आक्रमण करण भारताची बचावफळी भेदण्याचा प्रयत्न केला. अखेर ३८ व्या मिनीटाला भारतीय बचावफळीतला कमकुवतपणा हेरुन मलेशियाने सामन्यात १-१ अशी बरोबरी साधली. मात्र मलेशियाचा हा आनंद फारकाळ टिकू शकला नाही. ४० व्या मिनीटाला भारताने पेनल्टी कॉर्नरवर सुरेख चाल रचत मलेशियाचा बचाव भेदून सामन्यात २-१ अशी बरोबरी साधली. अखेरीस तिसऱ्या सत्राच्या अखेरीस भारताने २-१ अशी आघाडी कायम राखली. चौथ्या सत्रात मलेशियाच्या संघाने आपल्या खेळाची गती अधिक जलद करत भारतावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. यामधूनच मलेशियाने चौथ्या सत्रात दोन पेनल्टी कॉर्नर गमावले. मात्र भारतीय गोलकिपर पी. आर. श्रीजेशने मलेशियाचे सर्व मनसुबे उधळून लावले. सामना संपण्यासाठी अखेरची ३ मिनीटं शिल्लक असताना भारतीय संघाने कोणताही धोका न पत्करता बॉलचा ताबा जास्तीत जास्त आपल्याकडे ठेवण्यास सुरुवात केली. मात्र सामना संपण्यासाठी अखेरचं दीड मिनीटं शिल्लक असताना मलेशियाने पेनल्टी कॉर्नरवर गोल करत सामन्यात पुन्हा एकदा बरोबरी साधली. अखेर शूटआऊटमध्ये मलेशियाने बाजी मारत अंतिम फेरीतलं आपलं स्थान नक्की केलं.