इंडोनेशियात सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांचा पाचवा दिवस भारतासाठी काहीसा निराशाजनक गेला. ट्रॅप नेमबाजीत भारताच्या १५ वर्षीय शार्दुल विहानने मिळवलेलं रौप्यपदक आणि टेनिसमध्ये भारताच्या अंकिता रैनाला मिळालेलं कांस्यपदक याव्यतिरीक्त अन्य भारतीय खेळाडूंनी निराशा केली. ट्रॅप नेमबाजीमध्ये भारताचे अंकुर मित्तल आणि शार्दुल विहान हे दोन खेळाडू अंतिम फेरीसाठी पात्र ठरले होते. मात्र अंकुर मित्तल पदकाच्या शर्यतीमधून बाहेर पडला. अखेरच्या क्षणांमध्ये शार्दुलने आपल्या प्रतिस्पर्धी खेळाडूला टक्कर देण्याचा प्रयत्न केला, मात्र यामध्ये त्याला यश आलं नाही. नेमबाजीत भारताचं हे आतापर्यंतचं आठवं पदक ठरलं आहे. पाचव्या दिवसाच्या सुरुवातीला भारताची टेनिसपटू अंकिता रैनाने कांस्यपदकाची कमाई केली आहे. उपांत्य फेरीत अंकिताला चीनच्या झ्यांग शुईकडून पराभवाचा सामना करावा लागला. शुईने रैनावर ४-६, ७-६ अशी मात करत अंतिम फेरीत प्रवेश केला. तर दुसरीकडे टेनिसमध्ये पुरुषांच्या दुहेरी प्रकारात भारताची रोहन बोपण्णा आणि दिवीज शरण जोडी अंतिम फेरीत पोहचली आहे. अटीतटीच्या लढतीत बोपण्णा-शरण जोडीने जपानच्या प्रतिस्पर्धी जोडीवर ४-६, ६-३, १०-८ अशी मात केली. या विजयामुळे भारताच्या खात्यात किमान एक रौप्यपदक निश्चीत झालं आहे. याव्यतिरीक्त बॅडमिंटनमध्ये पी. व्ही. सिंधू, सायना नेहवाल यांनी आपले पहिले सामने जिंकत पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केला आहे. मात्र वेटलिफ्टींगमध्ये भारताच्या सर्व खेळाडूंना पराभवाचा सामना करावा लागला. जलतरण आणि रोविंग (नौकानयन) या खेळांमध्ये भारतीय खेळाडूंनी अंतिम फेरीत प्रवेश मिळवला होता, मात्र पदकं मिळवण्यात ते अपयशी ठरले.