करोना व्हायरसमुळे उद्भवलेला धोका लक्षात घेता भारतीय क्रिकेट संघ श्रीलंका आणि झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार नसल्याचे आज (शुक्रवारी) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) जाहीर केले. भारतीय संघ २४ जून जूनपासून श्रीलंका दौऱ्यात तीन एकदिवसीय आणि तीन टी २० मालिका खेळणार होता. तर त्यानंतर २२ ऑगस्टपासून नियोजित असलेल्या झिम्बाब्वे दौऱ्यात तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेचा समावेश होता. हे लांबणीवर टाकण्यात येतील अशी शक्यता आधी व्यक्त करण्यात येत होती. पण आता BCCI ने हे दोनही दौरे थेट रद्द केले आहेत.

BCCI ने १७ मे रोजी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केल्याप्रमाणे, मैदानातील परिस्थिती क्रिकेटसाठी अनुकूल आणि सुरक्षित असल्यानंतरच वार्षिक कराराअंतर्गत बांधिल असलेल्या खेळाडूंसाठी BCCI क्रिकेट प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करेल. BCCI आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत क्रिकेट पुन्हा सुरू करण्याच्या दिशेने पाऊल उचलण्यासाठी कटिबद्ध आहे, परंतु केंद्र व राज्य सरकार तसेच इतर संबंधित संस्थांनी करोन व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना धोकादायक ठरणार्‍या कोणताही निर्णय BCCI घेणार नाही, असे सचिव जय शाह यांनी स्पष्ट केले.