कार्याध्यक्षपदाची लढत रंगतदार ठरणार; कोषाध्यक्षपदासाठी पांडे आणि भेंडिगिरी यांच्यात सामना मुंबई : महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेची निवडणूक बिनविरोधपणे पार पाडण्याचे सर्व प्रयत्न अपयशी ठरले. त्यामुळे आता प्रतिष्ठेच्या कार्याध्यक्षपदासाठी दत्ता पाथ्रीकर यांना गजानन कीर्तिकर यांनी आव्हान दिले आहे, तर कोषाध्यक्षपदासाठी मंगल पांडे आणि रमेश भेंडीगिरी यांच्यात थेट सामना होणार आहे. अखेरच्या चढाईपर्यंत रंगणाऱ्या चित्तथरारक कबड्डी सामन्याप्रमाणेच राज्य कबड्डी संघटनेच्या २५ नोव्हेंबरला होणाऱ्या निवडणुकीची रंगत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या काही मिनिटांपर्यंत टिकून होती. निवडणूक टाळून विविध पदांवर समझोता करण्याचे सुकाणू समितीचे प्रयत्न अखेरच्या दिवसापर्यंत सुरू होते. त्या दृष्टीने मुंबई उपनगरच्या कीर्तिकर वगळता निवडणूक अर्ज भरलेल्या सर्वच म्हणजे ६९ उमेदवारांनी माघार घेत असल्याचे इच्छापत्रसुद्धा सुकाणू समितीकडे दिले होते. पण अखेरच्या दिवशी औरंगाबादच्या दत्ता पाथ्रीकर आणि कोल्हापूरच्या रमेश भेंडीगिरी यांनी निवडणूक लढवणार असल्याचे नवे पत्र निवडणूक अधिकाऱ्यांना सादर केले. त्यामुळे आता पाथ्रीकर विरुद्ध कीर्तिकर आणि पांडे विरुद्ध भेंडीगिरी अशा दोन लढती होणार आहेत. सरकार्यवाह या सर्वात महत्त्वाच्या पदावर अॅड. आस्वाद पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. ठाण्याच्या देवराम भोईर यांची उपाध्यक्षपदावर वर्णी लागली आहे. याशिवाय अर्जुन पुरस्कार विजेत्या कबड्डीपटू शकुंतला खटावकर यांनी महिला उपाध्यक्ष म्हणून कार्यकारिणीवर स्थान मिळवले आहे. पदांच्या वाटाघाटीमध्ये मुंबई शहराला स्थान न मिळाल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. अध्यक्ष (१) अजित पवार (पुणे) सरकार्यवाह (१) आस्वाद पाटील (रायगड) उपाध्यक्ष (६) ४ पुरुष : देवराम भोईर (ठाणे), अमरसिंह पंडित (बीड), शशिकांत गाडे (अहमदनगर), दिनकर पाटील (सांगली), २ महिला : शकुंतला खटावकर (पुणे), नेत्रा राजेशिर्के (रत्नागिरी) सहकार्यवाह (६) ४ पुरुष : मदन गायकवाड (सोलापूर), मोहन गायकवाड (नाशिक), रवींद्र देसाई (रत्नागिरी), महादेव साठे (उस्मानाबाद), २ महिला : सय्यदा शोयबा पटेल (नांदेड), स्मिता जाधव (परभणी)