महिला टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत इंग्लंड विरुद्धच्या उपांत्यफेरीच्या महत्वाच्या सामन्यातून मिताली राजला संघातून वगळण्यात आल्याने अनेकांना धक्का बसला होता. या निर्णयावरुन आता वाद निर्माण झाला आहे. मिताली राजची मॅनेजर अनिशा गुप्ताने अत्यंत कठोर शब्दात भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरवर टीका केली आहे. इंग्लंडकडून झालेल्या पराभवामुळे भारतीय महिला संघाचे टी-२० विश्वचषक स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.

सोशल मीडियावर अनेकांनी मिताली राजसारख्या संघातील सर्वात अनुभवी खेळाडूला बाहेर बसवण्याच्या निर्णयावर प्रश्न चिन्ह उपस्थित केले. मितालीला संघाबाहेर बसवण्याच्या निर्णयावर संतप्त झालेल्या अनिशाने हरमनप्रीतवर गंभीर आरोप केले आहेत. हरमनप्रीत कारस्थानी, खोट बोलणारी, अपरिपक्व आणि कर्णधारपदासाठी योग्य नसलेली व्यक्ती आहे अशा शब्दात टि्वटरवरुन तिने आपला राग व्यक्त केला.

ज्या अकाऊंटवरुन तिने हे टि्वट केले होते ते अकाऊंट काही वेळाने टि्वटरवरुन डिलिट करण्यात आले. पण इएसपीएन क्रिकइन्फोशी बोलताना ते टि्वटच आपणच केल्याचे तिने सांगितले. आता सामन्यांचे थेट प्रक्षेपण होते. त्यामुळे कोण प्रदर्शन करतो आणि कोण नाही करत ते आपल्याला दिसेलच असे तिने सांगितले.

सातत्यपूर्ण चांगले प्रदर्शन करुनही मितालीला काय वागणूक मिळाली ते आपण पाहिले. तिला जी वागणूक मिळाली ती चुकीची होती. युवा क्रिकेटपटूंना संधी द्यायची म्हणून इंग्लंड सारख्या संघाविरुद्ध उपांत्यफेरीच्या महत्वाच्या सामन्यात संघातील सर्वात अनुभवी, वरिष्ठ खेळाडूला वगळू नका असे अनिशाने म्हटले आहे. सामन्यानंतर हरमनप्रीतने मितालीला संघातून वगळण्याच्या निर्णयाबद्दल आपल्याला अजिबात खंत वाटत नसल्याचे सांगितले.

मिताली राज उत्तम फॉर्ममध्ये होती. स्पर्धेत दोन अर्धशतके झळकवणाऱ्या मितालीला सामनावीराचे दोन पुरस्कारही मिळाले. प्रकृती चांगली नसल्या कारणाने मिताली ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या शेवटच्या साखळी सामन्यात खेळू शकली नव्हती. उपांत्यफेरीच्या या लढतीत इंग्लंडच्या प्रभावी माऱ्यासमोर भारताचा डाव अवघ्या ११२ धावात संपुष्टात आला. भारताचे ११३ धावांचे लक्ष्य इंग्लंडने आठ गडी राखून सहज पार करत वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला.