भारत विरूद्ध इंग्लंड टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात झालीय. इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गनने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिलं. मात्र भारताला हवी तशी सुरवात करता आली नाही. पाच धावांचा पल्ला गाठेपर्यंतच भारताचे दोन गडी तंबुत परतले. यामध्ये चार चेंडूत एक धाव करुन परतलेला के. एल. राहुल आणि पाच चेंडूंमध्ये भोपळाही फोडू न शकलेल्या विराट कोहलीचा समावेश होता. हे दोघे बाद झाल्यानंतर पाचव्या षटकामध्ये शिखर धवन तंबूत परतला. ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यरने भारतीय संघाचा डाव सावरला. विराट शुन्यावर बाद झाल्याने त्या नावावर एका नकोश्या विक्रमाची नोंद झाली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांमध्ये सर्वाधिक वेळा कर्णधारपद भूषवताना शुन्यावर बाद होण्याचा विक्रम आता विराटच्या नावावर नोंदवला गेलाय. यापूर्वी हा विक्रम सौरभ गांगुलीच्या नावावर होता. विराट कर्णधार असताना १४ वेळा शुन्यावर बाद झालाय तर सौरभ गांगुली १३ वेळा अशाप्रकारे बाद झाला आहे.

कसोटी मालिकेमधील शेवटच्या सामन्यामध्ये विराटला फारशी चांगली कामगिरी करता आली नव्हती. भारताने सामना जिंकत मालिकाही खिशात घालती तरी विराट या सामन्यात आठ चेंडू खेळून भोपळाही न फोडता बाद झालेला. आजही विराट शुन्यावरच बाद झाला. आतापर्यंत विराट २८ वेळा शुन्यावर बाद झालाय. यापैकी १२ वेळा कसोटीमध्ये, १३ वेळा एकदिवसीय सामन्यांमध्ये आणि टी-२० मध्ये तीन वेळा तो शुन्यावर बाद झालाय. कसोटीनंतर पुन्हा एकदा शुन्यावर बाद होत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराट पहिल्यांदाच सलग दोन सामन्यात शुन्यावर तंबूत परतलाय. तर मागील पाच सामन्यांमध्ये (कसोटी आणि टी-२० मिळून) विराट पाचव्यांदा शुन्यावर बाद झालाय. विराटने मागील ३७ खेळींमध्ये एकही आंतरराष्ट्रीय शतक ठोकलेलं नाही. विराटने शेवटचं शतक २०१९ मध्ये २३ नोव्हेंबर रोजी बांगलादेशविरोधात केलं होतं.

याशिवाय सर्वाधिक वेळा टी-२० मध्ये शुन्यावर बाद होण्याचा विक्रम कर्णधार म्हणून विराटच्या नावावर नोंदवला गेलाय. विराट तीन वेळा शुन्यावर बाद झालाय. सोशल नेटवर्किंगवरही विराटच्या या बॅड पॅचसंदर्भात जोरदार चर्चा असून विराटला नक्की काय झालंय असा प्रश्न त्याचे चाहते विचारताना दिसत आहेत.