इंग्लंडचा महान वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या आधी खेळपट्टीबाबत मोठी प्रतिक्रिया दिली आहे. ट्रेंट ब्रिज कसोटी सामन्यासाठी खेळपट्टीवर काही गवत असेल, तर भारतीय संघाने त्याबद्दल तक्रार करू नये असे अँडरसनने म्हटले आहे. जेव्हा इंग्लंडचा संघ भारताच्या दौऱ्यावर गेला होता, तेव्हा टीम इंडियानेही घरचा फायदा घेतला होता आणि या कारणास्तव इंग्लंडलाही हिशोब चुकता करावा लागेल, असेही अँडरसनने सांगितले. जेम्स अँडरसन म्हणाला, ''प्रत्येक देश आपल्या घरगुती परिस्थितीचा लाभ घेतो आणि त्यावर आक्षेप असू नये. ही दुधारी तलवार देखील असू शकते, कारण भारतीय संघाकडे जबरदस्त वेगवान गोलंदाज आहेत.'' भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका उद्या ४ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. पहिल्या कसोटी सामन्याच्या खेळपट्टीचे चित्र पाहता, वेगवान गोलंदाजांना यावर खूप मदत मिळू शकते. खेळपट्टीवर इतके गवत आहे, की मैदान आणि खेळपट्टीमध्ये फारसा फरक नाही. पहिल्या सामन्यासाठी अशीच खेळपट्टी राहिली, तर इंग्लंडचे गोलंदाज खूप धोकादायक ठरू शकतात. हेही वाचा - “त्यांनी मला भारतासाठी खेळताना पाहिले नाही”, विराटला येतेय ‘खास’ व्यक्तीची आठवण इंग्लंडचा संघ जेव्हा भारताच्या दौऱ्यावर गेला होता, तेव्हा खेळपट्टीवर बरेच प्रश्न उपस्थित झाले होते. भारतीय फिरकीपटूंसमोर इंग्लंडच्या संघाने निराशाजनक प्रदर्शन केले होते. यानंतर, इंग्लंडच्या अनेक माजी क्रिकेटपटूंनी खेळपट्टीवर बरेच प्रश्न उपस्थित केले. अशा परिस्थितीत इंग्लिश संघाला त्या पराभवाचा बदला घ्यायला नक्कीच आवडेल. हेड-टू-हेड आकडेवारी आतापर्यंत इंग्लंड आणि भारत या संघात एकूण १२६ कसोटी सामने झाले आहेत. त्यापैकी २९ सामन्यात भारताने, तर ४८ सामन्यात इंग्लंडने विजय मिळवला आहे. तर ४९ सामने अनिर्णित ठरले आहेत. या सामन्यांपैकी ६२ सामने इंग्लंडमध्ये झाले आहेत. त्यात ३४ सामन्यात इंग्लंडने, तर ७ सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. तर २१ सामने अनिर्णित ठरले आहेत.