विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाचा जून महिन्यातला श्रीलंका दौरा करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे स्थगित करण्यात आला आहे. आयपीएलचा तेरावा हंगाम आटोपल्यानंतर भारतीय संघ जून महिन्यात श्रीलंकेत ३ वन-डे आणि टी-२० सामन्यांची मालिका खेळणार होता. श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने ही मालिका प्रेक्षकांविना खेळवण्याची तयारीही दाखवली होती. मात्र भारत सरकारने आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी अद्याप परवानगी दिलेली नसल्यामुळे बीसीसीआयने या दौऱ्याबद्दल निर्णय घेतला नव्हता. अखेरीस करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे हा दौरा स्थगित करण्यात आल्याचं श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने स्पष्ट केलं.

श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने जाहीर केलेल्या परिपत्रकात, बीसीसीआय आयसीसीने जाहीर केलेल्या FTP प्रमाणे लंकेसोबत खेळण्यासाठी कटीबद्ध असल्याचं म्हटलंय. मात्र करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आल्याचं लंकन बोर्डाने स्पष्ट केलंय. काही दिवसांपूर्वी श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने बीसीसीआयला आयपीएलचा तेरावा हंगाम लंकेत आयोजित करण्याचा पर्याय सुचवला होता. परंतू टी-२० विश्वचषकाबद्दल आयसीसीने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नसल्यामुळे बीसीसीआयने सध्या सर्व प्रस्तावांवर सावध भूमिका घेण्याचं ठरवलंय.

अवश्य वाचा – IPL साठी बीसीसीआय सज्ज, टी-२० विश्वचषकाबद्दल आयसीसीच्या निर्णयाची प्रतीक्षा !