नवी दिल्ली : हार्दिक पंडय़ासमवेत एका टीव्ही कार्यक्रमात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून माघार घ्यावी लागल्यामुळे मला माझ्याच चारित्र्यावर संदेह वाटू लागला होता, असे क्रिकेटपटू लोकेश राहुल याने सांगितले.

‘कॉफी वुइथ करण’ कार्यक्रमातील वादग्रस्त मुलाखतीसंदर्भात राहुल प्रथमच मोकळेपणाने बोलला. ‘‘त्या काळात मी कुठे बाहेरदेखील पडत नव्हतो. जवळपास ८-१० दिवस मी केवळ सरावाला मैदानावर जायचो आणि तिथून थेट घरी यायचो. जेव्हा तुमच्याबद्दल इतके वाईट लिहिले किंवा बोलले जात असेल, त्यावेळी तुम्हाला स्वत:च्याच चारित्र्यावर शंका उपस्थित व्हायला लागते. आपण खरेच इतके वाईट आहोत का? असे प्रश्न मनात येतात. मात्र या संपूर्ण कालावधीत माझे संघ सहकारी, मित्र आणि कुटुंबिय माझ्या पाठिशी उभे राहिल्याने मी त्यातून सावरू शकलो,’’ असे राहुलने नमूद केले.