वसई-विरार शहर महानगरपालिका आणि कला-क्रीडा महोत्सव समितीच्या विद्यमाने आयोजित दुसऱ्या राष्ट्रीय महापौर मॅरेथॉन स्पर्धेत एलम सिंग याने ४२ किमीची दौड दोन तास, २१ मिनिटे व ५८ सेकंदांत पार करून दोन लाख रुपयांचा पुरस्कार आणि चषक प्राप्त केला. या स्पर्धेत बिन्निंग लिंगखोईने दुसरा (दोन तास २५ मिनिटे) तर गिरीशचंद्र तिवारीने तिसरा क्रमांक (२ तास २८ मिनिटे) पटकावला. महिला गटात अर्धमॅरेथॉन कविता राऊत, मोनिका अत्रे व किरण तिवारी यांनी अनुक्रमे एक तास २२, २३ व २४ मिनिटांत पार करीत अनुक्रमे पहिले तीन क्रमांक जिंकले. २१ किमीच्या पुरुषांच्या अर्धमॅरेथॉन स्पध्रेत आशिषसिंग चौहान, अर्जुन प्रधान व संदीप कुमार यांनी अनुक्रमे एक तास ७, ८, ९ मिनिटांत पार करीत पहिल्या तीन क्रमांकावर नाव कोरले.
रविवारी सकाळी ७ वाजता विरार येथील विवा कॉलेजसमोरून ४२ किमीची पूर्ण मॅरेथॉन सुरू झाली. ‘स्त्री-भ्रूणहत्या टाळा व निसर्ग समतोल पाळा’ हा संदेश देणारी तसेच ‘वृक्ष लावा, वृक्ष जोपासा’ हा संदेश देणाऱ्या या मॅरेथॉन स्पर्धेतील धावपटूंचे हजारो वसईकरांनी रस्त्यांच्या दुतर्फा गर्दी करीत जोरदार स्वागत केले. या मॅरेथॉनमध्ये १४ वर्षांखालील, १८ वर्षांखालील, बाल गटातील बालक-पालक, फन मॅरेथॉन, ५० वर्षांवरील तसेच ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांचे गट पाडण्यात आले होते. एका अपंगाने २१ किमीचे अंतर पार केल्याने त्याचा विशेष गौरव करण्यात आला.
ऑलिम्पिक पदक विजेता सुशील कुमार यादव, मिलिंद सोमण, शायनी विल्सन आदी नामांकित क्रीडापटू आणि सिनेताऱ्यांनी या स्पध्रेला आवर्जून उपस्थिती राखली.