आठवडय़ाची मुलाखत: शुकमणी बाब्रेकर, राष्ट्रीय तिरंदाज

ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत भाग घेण्याचे प्रत्येक खेळाडू स्वप्न पाहत असतो. मीदेखील हे स्वप्न पाहत आहे. मात्र त्यामध्ये किमान कांस्यपदक जिंकण्याचे माझे ध्येय आहे व त्यासाठी अहोरात्र मेहनत आतापासूनच करत आहे, असे उदयोन्मुख तिरंदाज शुकमणी बाब्रेकर याने सांगितले. शुकमणीने नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेतील रिकव्‍‌र्ह ऑलिम्पिक राऊंड प्रकारात सुवर्णपदक मिळवत ऐतिहासिक कामगिरी केली. या प्रकारात वरिष्ठ स्तरावरील त्याचे हे पहिलेच वैयक्तिक विजेतेपद आहे. पण त्याचबरोबर महाराष्ट्राला या प्रकारात मिळालेले पहिले सुवर्णपदक आहे. शुकमणी हा १९ वर्षीय खेळाडू अचलपूरजवळील परतवाडा येथील रहिवासी असून त्याने आजपर्यंत राज्य व राष्ट्रीय स्तरावर अनेक पदकांची कमाई केली आहे. आजपर्यंतच्या व भावी वाटचालीबाबत त्याच्याशी साधलेला संवाद.

NCP releases manifesto
भाजपला नकोसे मुद्दे राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यात; जातनिहाय जनगणना, किमान आधार मूल्याचे अजित पवार गटाकडून आश्वासन
National Consumer Commission hearings,
राष्ट्रीय ग्राहक आयोगातील सर्वसुनावण्या १५ एप्रिलपासून ऑनलाईन!
Eknath khadase and sharad pawar
“शरद पवारांचा मी ऋणी, संकटाच्या काळात मला…”, भाजपात परतणाऱ्या एकनाथ खडसेंचं विधान चर्चेत
new international cricket stadium in thane marathi news
ठाण्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान? ‘एमसीए’ची एकमेव निविदा दाखल

वरिष्ठ राष्ट्रीय सुवर्णपदकाची खात्री होती काय

पदक मिळविण्याची खात्री होती. वरिष्ठ गटातील वैयक्तिक विभागात अनेक तुल्यबळ स्पर्धकांचा सहभाग होता. तरीही वरिष्ठ राष्ट्रीय स्तरावर सांघिक सुवर्णपदक जिंकले असल्यामुळे तेथील अनुभवाचा फायदा मला मिळाला. सेनादलाच्या अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडूंचे माझ्यापुढे आव्हान असले तरी कोणतेही दडपण न घेता आपल्या अचूकतेवर लक्ष केंद्रित करण्यावर मी भर दिला होता. त्यामुळेच आत्मविश्वासाने सुवर्णपदक मिळवू शकलो. पहिल्या दोन फे ऱ्यांमध्ये सबीत खासलेरी व प्रियांक कुमार या अनुभवी खेळाडूंवर मात केल्यानंतर आता सुवर्णपदक जिंकण्यासाठीच खेळायचा निश्चय करत मी पुढच्या फे ऱ्यांमध्ये अव्वल कामगिरी करू शकलो. हे विजेतेपद मिळवल्यामुळे मला खूप आनंद झाला. अर्थात आता कुठे आपला तिरंदाजीचा प्रवास सुरू झाला आहे व अजून बराच पल्ला गाठावयाचा आहे याचीही मला जाणीव झाली.

परतवाडासारख्या दुर्लक्षित भागात तुला या खेळाचे बाळकडू कोठे मिळाले

मला लहानपणापासूनच तिरंदाजीबाबत विलक्षण आकर्षण होते. आमच्या परिसरात काही जण तिरंदाजी करत असत. त्यांचा सराव पाहून आपणही हा खेळ खेळला पाहिजे असे मला वाटत असे. फातिमा इंग्रजी प्रशालेत पाचव्या इयत्तेत शिकत असतानाच मी या खेळाच्या प्रशिक्षणाला सुरुवात केली. समीर म्हस्के यांच्याकडून मला या खेळाचे बाळकडू लाभले आहे. अजूनही त्यांचे मला मार्गदर्शन मिळत असते. त्याचप्रमाणे अमरावती येथील क्रीडा प्रबोधिनीतही मला या खेळाचे मार्गदर्शन मिळत आहे. मुळातच या खेळातच कारकीर्द करायचे मी ठरवले होते. आई-वडिलांकडूनही मला सतत प्रोत्साहन मिळत असते. त्यामुळेच सतत या खेळाबाबत विविध प्रशिक्षक व वरिष्ठ आंतरराष्ट्रीय खेळाडूंचे कौशल्य पाहून त्यांच्याकडून काही ना काही तरी शिकवण घेण्याची वृत्ती मला खूप उपयोगी पडते.

दररोज स्पर्धात्मक व पूरक व्यायामचा सराव किती करतो?

अधिकाधिक सराव केला तर तुमचे कौशल्य वाढू शकते हे लक्षात घेऊनच मी दररोज आठ ते दहा तास सराव करतो. त्यामध्ये प्रामुख्याने अचूक नेम साधण्यावर भर दिला जातो. त्याचप्रमाणे आमच्या खेळात एकाग्रतेस अधिक महत्त्व असल्यामुळे दररोज सकाळी अर्धा तास ध्यानधारणा करतो. त्याचप्रमाणे योगासन व अन्य पूरक व्यायामांचाही दैनंदिन सरावात समावेश असतो. स्पर्धेच्या वेळी एकाच स्थितीत बराच वेळ उभे राहावे लागते. त्या दृष्टीनेही सराव करावा लागतो आणि तेही हातात धनुष्य घेऊन.

ऑलिम्पिकसाठी कशी तयारी करत आहेस?

ऑलिम्पिक स्पर्धेला अद्याप दोन वर्षांचा कालावधी असला, तरी यंदाची आशियाई क्रीडा स्पर्धा ही त्यासाठी रंगीत तालीम असणार आहे. त्याची पात्रता पूर्ण करण्याचे माझे पहिले ध्येय आहे. ऑलिम्पिक गोल्ड क्वेस्टसारख्या संस्थेचे पाठबळ मला लाभले आहे. त्यामुळेच आशियाई स्पर्धेची पात्रता पूर्ण करीत तेथे पदक मिळविण्यासाठी मी प्रयत्न करीत आहे. आमच्या खेळात ऑलिम्पिक पदक मिळवण्यासाठी आपल्या देशात भरपूर नैपुण्य आहे. शासनाबरोबरच उद्योग संस्थांचे पाठबळ लाभले, तर भारतीय तिरंदाज ऑलिम्पिक पदकाचे स्वप्न साकार करील अशी मला खात्री आहे.