आजच्याच दिवशी नऊ वर्षांपूर्वी २ एप्रिल २०११ ला भारतीय क्रिकेट संघाने आयसीसी विश्वचषकावर आपलं नाव कोरलं होतं. मुंबईच्या वानखेडे स्टेडियम येथे पार पडलेल्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात कर्णधार महेंद्रसिंग धोनीने षटकार खेचत भारताला विश्वविजेतेपद मिळवून दिले. या विजयामुळे भारताने पुन्हा एकदा २८ वर्षानंतर विश्वचषकावर नाव कोरले होते.

WC 2011 : धोनीच्या षटकाराचं कौतुक झाल्यावर गंभीर भडकला, म्हणाला…

या सामन्यात धोनीने वापरलेली ती बॅट क्रिकेट इतिहासातील महागड्या बॅटपैकी एक ठरली. त्याची ही बॅट जुलै २०११ मध्ये लंडनमधील चॅरिटी डिनर लिलावात विकत घेण्यात आली. त्या बॅटने समस्त भारतीयांची विश्वविजयाची स्वप्नपूर्ती केली. भारताने २०११ साली वर्ल्डकप जिंकला. त्याचवर्षी जुलै महिन्यात लंडनमधली एका हॉटेलमध्ये झालेल्या लिलावात भारतातील आरके ग्लोबल या गुंतवणूक समूहाने तब्बल ७२ लाखांना ती बॅट विकत घेतली. या लिलावातून आलेले पैसे साक्षी फाउंडेशन या धोनीची पत्नी साक्षी हिच्या चॅरिटी फाउंडेशनसाठी देण्यात आले. साक्षी फाउंडेशन गरजू लहान मुलांसाठी काम करते. त्याच्या या बॅटची ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’मधेही नोंद आहे.

WC 2011 : धोनीमुळेच माझं वर्ल्ड कपमधील शतक हुकलं – गौतम गंभीर

भारताने २८ वर्षांनंतर जिंकला होता विश्वचषक

प्रथम फलंदाजी करत श्रीलंकेच्या संघानं विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात २७४ धावांचा डोंगर रचला होता. ज्यामध्ये महेला जयवर्धनेने १०३ धावा केल्या होत्या. कुमार संघकाराने या सामन्यात ४८ धावा केल्या होत्या. श्रीलंकेच्या खेळाडूंसमोर गोलंदाजी करणाऱ्या भारतीय संघातील युवराज सिंह आणि झहिर खान या दोघांनीही प्रत्येकी दोन गडी बाद केले होते. लंकन खेळाडूंच्या फटकेबाजीनंतर चाहत्यांच्या पाठिंब्याच्या साथीने भारतीय संघ मैदानात उतरला.

WC 2011 Flashback : आजच्याच दिवशी भारत झाला होता विश्वविजेता

सुरुवातीपासूनच श्रीलंकन गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांच्या नाकीनऊ आणले होते. सेहवाग आणि सचिन हे दोन्ही खेळाडू, ज्यांच्याकडून अनेक अपेक्षा होत्या ते अगदी स्वस्तात तंबूत परतले होते. पण, गौतम गंभीरने भारताची बाजू सांभाळत ९७ धावा केल्या. ज्यात भर पडली ती म्हणजे कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या ९१ धावांची. धोनीच्या या धावांमध्ये त्याच्या फलंदाजीचं कौतुक करावं तितकं कमीच होतं. पण, मुळात त्याने मारलेला शेवटचा षटकारच या सामन्यात खऱ्या अर्थाने ‘चार चाँद’ लावून गेला. धोनीच्या त्या षटकारामुळे आणि संघातील प्रत्येक खेळाडूच्या योगदानामुळे भारताने १९८३ नंतर २८ वर्षांनी विश्वचषक उंचावला.