पाकिस्तान क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी आणि निवड समिती अध्यक्षपदी माजी कर्णधार मिस्बाह उल हक याची नुकतीच निवड करण्यात आली. आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर मिस्बाह उल हक याने पाकिस्तानच्या खेळाडूंना शिस्त लावण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानी खेळाडूंच्या फिटनेसवर विश्वचषक स्पर्धा २०१९ मध्ये खूप प्रश्न उपस्थित करण्यात आले. त्यामुळे बिर्याणी आणि त्यासारख्या खाद्यपदार्थांपासून दूर राहण्याचे आदेश  नव्या प्रशिक्षकाकडून पाकिस्तानी क्रिकेट संघाला देण्यात आले आहेत.

मिस्बाहच्या निवडीनंतर पाकिस्तानी क्रिकेट संघाचे पहिले सराव शिबीर भरवण्यात आले. या शिबिरात पाकिस्तानी खेळाडूंच्या फिटनेसच्या मुद्द्यावर भर देण्यात आला. पाकिस्तानी खेळाडूंच्या आहारात आता बिर्याणी, तेलकट पदार्थ किंवा गोड पदार्थांचा समावेश करण्यात येणार नाही, असे पाकिस्तानी क्रिकेट संघाचे आहार व्यवस्थापन सांभळणाऱ्या कंपनीच्या सदस्याने सांगितले.

‘बिर्याणी खात बसलात, तर वर्ल्ड कप विसरा’; अक्रम पाकिस्तानी क्रिकेटपटूंवर बरसला

पाकिस्तानी खेळाडू हे जंक फूड आणि तेलकट पदार्थ तसेच मांसाहाराचे खवय्ये आहेत हे साऱ्यांनाच माहिती आहे. ते जेव्हा पाकिस्तानी संघाचे प्रतिनिधित्व करत नसतात, तेव्हा ते अशा पदार्थांवर आडवा हात मारतात. पण आता त्यांच्या आहाराचे एक लॉग बूक ठेवले जाणार असून त्यांच्या आहाराची नोंद ठेवली जाणार आहे. आणि जर कोणी या संदर्भातील नियम मोडला तर त्याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात येणार आहे, असे मिस्बाहने सांगितल्याचे सूत्रांनी सांगितले.

सानिया मिर्झा ट्रोल: भारतीय म्हणाले ‘धन्यवाद’ तर पाकिस्तानी म्हणाले ‘वहिनी तर रॉ एजंट’

दरम्यान, ICC World Cup 2019 स्पर्धेआधी पाकिस्तानच्या खेळाडूंना बिर्याणीचा आहार देण्यात येत असल्यामुळे पाकचा माजी कर्णधार वसीम अक्रम चांगलाच भडकला होता. तसेच भारतीय संघाविरुद्धच्या सामन्याच्या आदल्या रात्री पाकिस्तानी संघ हुक्का पार्लरमध्ये पार्टी करत असल्याचे दिसले होते. या संदर्भात काही फोटो आणि व्हिडिओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाले होते. या व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा, तिचा पती शोएब मलिक आणि इतर पाकिस्तानी खेळाडूही होते. हे सारे जण सोबत हुक्का पार्लरमध्ये दिसले होते. त्यामुळेही पाकिस्तानी खेळाडू आणि सानिया मिर्झा ट्रोल झाली होती.