रणजीच्या अंतिम फेरीत मुंबईने अभिषेक नायरच्या ९१ धावांच्या झुंजार खेळीच्या जोरावर गुजरातसमोर विजयासाठी ३१२ धावांचे आव्हान ठेवले आहे. नायरचे शतक अवघ्या ९ धावांनी हुकले. नायर आणि आदित्य तरे यांनी चांगली फलंदाजी करत मुंबईला सुस्थितीत आणले. अंतिम सामन्याच्या पहिल्या दोन दिवसांच्या खेळीवर गुजरातने वर्चस्व गाजवले होते. वाचा: मुंबईची गाडी रुळावर मुंबईने तिसऱया आणि चौथ्या दिवशी खणखणीत प्रत्युत्तर देत सामन्यात पुनरागमन केले. मुंबईने तिसऱया दिवशी तीन बाद २०८ धावांवरून दुसऱया डावात ४११ धावांपर्यंत मजल मारली. कर्णधार आदित्य तरे याने ६९ तर अभिषेक नायरने ९१ धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली. होळकर स्टेडियमवर सुरु असलेल्या या सामन्यात मुंबईच्या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातला चौथ्या दिवसाच्या अखेरीस बिनबाद ४७ धावा केल्या आहेत. त्यामुळे सामन्याचा पाचवा दिवस उत्कंठावर्धक असणार आहे. गुजरातच्या संघाला रणजीच्या इतिहासात पहिल्यांदाच रणजीचे जेतेपद पटकाविण्याची संधी आहे. तर मुंबईच्या संघाला ४६ व्यांदा रणजी करंडक जिंकायचा असेल तर अखेरच्या दिवशी गुजरातला ३१२ धावांच्या आत गुंडाळावे लागणार आहे. वाचा: पृथ्वीने दीपवले, तरी.. तत्पूर्वी, मुंबईचा पहिला डाव २२८ धावांत संपुष्टात आला होता. त्यानंतर प्रत्युत्तरात गुजरातने ३२८ धावा करत १०० धावांची आघाडी घेतली होती. त्यानंतर आज मुंबईने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातची सलामीजोडी प्रियांक पांचाळ(३४) आणि समित गोहेल (९) धावा करून नाबाद आहेत. गुजरातला विजयासाठी अजून २६५ धावांची गरज असून एकही विकेट गमावलेली नाही.