सौराष्ट्रावर अंतिम फेरीत मात करुन विदर्भाने सलग दुसऱ्यांदा रणजी करंडक स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. प्रशिक्षक चंद्रकांत पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या विदर्भाने स्थानिक क्रिकेटमध्ये सर्वांना आपली दखल घ्यायला भाग पाडली. आपल्या कडक शिस्तीसाठी ओळखल्या जाणाऱ्या चंद्रकांत पंडीत यांनी संघाची घडी बनवण्यासाठी काही नियम आखले होते. कर्णधार फैज फजलनेच सामन्यानंतर या गोष्टीचा उलगडा केला आहे.

अवश्य वाचा – विदर्भाची यशोगाथा!

आपल्या गोलंदाजांचा शिस्त लागावी यासाठी चंद्रकांत पंडीत यांनी, सामन्यात नो-बॉल टाकणाऱ्या गोलंदाजांना 500 रुपयांचा दंड ठेवला होता. याचसोबत जो गोलंदाज सामन्यात नो-बॉलवर विकेट घेईल त्याला 1 हजार रुपयांचा दंड भरावा लागायचा. पंडीतांच्या याच कडक शिस्तीमुळे विदर्भाच्या गोलंदाजांनी अंतिम फेरीत आपली कमाल दाखवली. आदित्य सरवटे, अक्षय वाखरे यांनी सौराष्ट्राचा डाव झटपट गुंडाळण्यासाठी मदत केली. याचसोबत चंद्रकांत पंडीत यांना संघाला शिस्त लागण्यासाठी उशीरा येणारे खेळाडू, ड्रेसकोड न पाळणाऱ्या खेळाडूंनाही दंड भरायला लावल्याचं फजल म्हणाला.