पुढील वर्षी ट्‌वेंटी-२० विश्‍वकरंडक स्पर्धा बांगलादेशमध्ये १६ मार्च ते ६ एप्रिल दरम्यान खेळविली जाणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट काऊन्सिलने पुढील वर्षी होणा-या या वर्ल्डकप सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. एकूण १६ देश यामध्ये सहभागी होणार असून, भारताचा पहिला सामना पाकिस्तानशी होणार आहे.
२२ दिवस खेळविल्या जाणाऱ्या या स्पर्धेदरम्यान बांगलादेशामधील चित्तगांव, ढाका व सिल्हेट या शहरांमध्ये एकूण ६० सामने खेळविले जाणार आहेत. यामध्ये पुरुष संघाचे ३५ सामने, तर महिलांच्या संघाच्या २५ सामन्यांचा समावेश आहे.
ट्‌वेंटी-२० प्रकारच्या नामांकनानुसार पहिल्या आठ संघांना थेट सुपर-१० फेरीमध्ये प्रवेश मिळणार आहे. भारताचा या आठ संघांमध्ये समावेश आहे.पहिल्याच सामन्यात भारताची गाठ पारंपारिक प्रतिस्पर्धी असणा-या पाकिस्तानशी होणार आहे. १३ मार्च रोजी मिरपूरच्या शेरे ए बांगला क्रिकेट स्टेडियमवर भारत पाक सामना रंगेल. ३ एप्रिल आणि ४ एप्रिल रोजी उपांत्यापूर्व सामने होणार असून ६ एप्रिलला शेर ए बांगला मैदानावरच अंतिम सामना रंगणार आहे.