भारतीय संघ विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरीत संघाबाहेर गेला. त्यानंतर भारतीय संघाच्या निवड समितीवर अनेक प्रश्न उपस्थित केले गेले. भारतीय संघ निवड समिती ही कर्णधार विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या दबावाखाली कार्यरत आहे का? असा सवाल अनेक क्रिकेट जाणकारांकडून निर्माण करण्यात आला. यावर निवड समिती अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी स्वतः उत्तर दिले आहे. एका विशेष मुलाखतीत प्रसाद यांनी विविध मुद्द्यांवर मोकळेपणाने चर्चा केली.

“रवी शास्त्री आणि विराट कोहली हे संघाचे अनुक्रमे प्रशिक्षक आणि कर्णधार आहेत. राहुल द्रविड भारत अ संघाचा प्रशिक्षक आहे. त्यांना त्यांच्या भूमिका आणि जबाबदाऱ्या नीटपणे माहिती आहेत. आम्ही निवड समिती सदस्य देखील आमच्या जबाबदाऱ्या जाणतो. त्यामुळे काही वेळा जर संघ निवड करताना आम्ही त्यांचे मत विचारात घेतले तर त्यांचा आमच्यावर दबाव आहे असा अर्थ घेतला जाऊ नये. आमच्यामध्येही संघ निवडताना अनेकदा मतमतांतरे असतात, पण आम्ही त्याची जाहीर वाच्यता करत बसत नाही. जे ४ भिंतीत घडतं, ते ४ भिंतीतच राहिलेलं चांगलं असतं. अखेर भारतीय संघासाठी जे चांगले आणि लाभदायक असते असेच निर्णय आम्ही घेतो”, अशा शब्दात प्रसाद यांनी हे आरोप फेटाळून लावले.

याशिवाय, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील अनुभवावरून बऱ्याचदा प्रसाद यांच्यावर टीका होत होती. मात्र ‘जास्त खेळल्याने अधिक ज्ञान मिळते, हा गैरसमज आहे, असे मला वाटते’, असे सांगत प्रसाद यांनी टीकाकारांना सणसणीत चपराक लगावली. अवघ्या सहा कसोटी सामन्यांचा अनुभव गाठीशी असलेल्या प्रसाद यांच्यावर माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनीही टीकास्त्र सोडले होते.

‘‘निवड समितीत नियुक्ती करताना सदस्यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव आहे का, हा एकमेव निकष असतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटव्यतिरिक्त आमच्याकडे ४७७ प्रथम श्रेणी सामन्यांचा अनुभव आहे. तसेच आमच्या कार्यकाळात आम्ही २०० पेक्षा जास्त प्रथम श्रेणी सामने पाहिले आहेत. त्यामुळे संघात खेळाडूंची निवड करताना हा अनुभव पुरेसा नाही का? जर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील अनुभव हा एकमेव निकष असता तर राजसिंग डुंगरपूर हे एकही सामना न खेळता निवड समितीचे अध्यक्ष कसे झाले असते? राजसिंग यांनीच सचिन तेंडुलकरसारखा हिरा शोधून काढला’’, असे त्यांनी उत्तर दिले.