मुंबईचा जलदगती गोलंदाज तुषार देशपांडेची, सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेसाठी संघात निवड झाली. मात्र गेल्या दोन वर्षांपासून कॅन्सरशी लढा देत असलेल्या तुषारच्या आईने मुलुंडच्या फोर्टीस रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. यावेळी तुषार आपल्या संघासोबत सरावात मग्न होता. ही बातमी समजल्यानंतर तुषार संघासोबत राहिल अशी कोणीही अपेक्षा केली नव्हती. मात्र तुषारने आपल्या आईच्या इच्छेचा मान राखत संघाकडून खेळण्याचा निर्णय घेतला आहे.

“आईची आठवण मला नेहमी येत राहिलं. पण मी नेहमी चांगलं खेळत रहावं हीच माझ्या आईची इच्छा होती. आता थांबलो तर तिला आवडणार नाही.” आपल्या आईविषयी बोलत असताना तुषार भावूक झाला होता. “कॅन्सरच्या उपचारांमुळे आई महिनाभर कोणाशीही बोलत नव्हती, मात्र तिचं आमच्यासोबत असणं हे आम्हाला पुरेसं होतं. गेल्या दोन वर्षांपासून आईवर केपोथेरपी करण्यात येत होती. मात्र हे तिला सहन होत नव्हतं. प्रत्येक वेळी मी तिच्यासोबत रहायचो. आई सोबत असणं हे प्रत्येकासाठी महत्वाचं असतं. त्यामुळे तिचं स्वप्न पूर्ण करणं हेच माझं ध्येय आहे.”

सुपर लिग प्रकारात मुंबईसमोर कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि विदर्भाविरुद्ध सामने खेळायचे आहेत. या ३ सामन्यांनंतर मुंबईने आपल्या गटात अव्वल स्थान राखल्यास अंतिम फेरीत प्रवेश मिळणार आहे.

सुपर लिग प्रकारासाठी असा असेल मुंबईचा संघ –

श्रेयस अय्यर (कर्णधार), धवल कुलकर्णी, शार्दुल ठाकूर, सिद्धेश लाड, जय बिस्ता, पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव, तुषार देशपांडे, आदित्य तरे, एकनाथ केरकर, शुभम रांजणे, आकाश पारकर, शम्स मुलानी, ध्रुमिल मतकर, रोस्टन डायस

अवश्य वाचा – सय्यद मुश्ताक अली टी-२० : अजिंक्य रहाणेची माघार, श्रेयस अय्यर मुंबईचा कर्णधार