कर्णधार विजय झोल (१००) आणि संजू सॅमसन (१००) यांच्या शानदार शतकांच्या बळावर भारताने परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर ४० धावांनी मात केली आणि युवा (१९ वर्षांखालील) आशिया चषक विजेतेपदावर नाव कोरले.
झोलने १२० चेंडूंत ७ चौकार आणि २ षटकारांसह आपली शतकी खेळी साकारली, तर सॅमसनने फक्त ८७ चेंडूंमध्ये ८ चौकार आणि ४ षटकारांनिशी आपली खेळी उभारली. त्यामुळे भारताला ५० षटकांत ३१४ धावांचे आव्हान उभारता आले. प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानला ९ बाद २७४ धावा करता आल्या. त्यांच्या कमरान गुलामने ८९ चेंडूंत १२ चौकारांसह नाबाद १०२ धावा केल्या.
प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताला अंकुश बेन्स (४७) आणि अखिल हेरवाडकर (१२) यांनी ६.४ षटकांत ६५ धावांची सलामी नोंदवून दिली. हे दोन फलंदाज बाद झाल्यानंतर झोल आणि सॅमसन यांनी तिसऱ्या विकेटसाठी १८० धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. पाकिस्तानकडून झफर गोहर, झिया उल हक आणि करामत यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. गेल्या वर्षीही भारत आणि पाकिस्तान हे दोन संघ अंतिम फेरीत आमनेसामने होते. त्यावेळी हा सामना टाय झाल्यामुळे आशिया चषकात दोन्ही संघ संयुक्त विजेते झाले होते.