Women's T20 World Cup : टी २० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने न्यूझीलंडचा अटीतटीच्या लढतीत ३ धावांनी पराभव करत उपांत्य फेरीत धडक मारली. शफालीची (४६) धडाकेबाज खेळी आणि तिला तानियाने (२३) दिलेली साथ याच्या बळावर भारताने न्यूझीलंडला १३४ धावांचे आव्हान दिले होते. पण या आव्हानाचा पाठलाग करताना त्यांचे प्रयत्न ३ धावांनी तोकडे पडले. भारताने तीन पैकी तीन सामने जिंकून ६ गुणांसह गुणतालिकेतील अव्वल स्थान कायम राखले आणि स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. India have qualified for the #T20WorldCup semi-finals pic.twitter.com/3QLefaxNpE — T20 World Cup (@T20WorldCup) February 27, 2020 १३४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सलामीवीर प्रिस्ट १२ धावा करून माघारी परतली. पाठोपाठ अनुभवी सुझी बेट्सदेखील त्रिफळाचीत होऊन तंबूत परतली. कर्णधार सोफी डिव्हाईनही १४ धावा करून बाद झाली. त्यामुळे न्यूझीलंडची अवस्था ३ बाद ३४ झाली होती. त्यानंतर मॅडी ग्रीन आणि केटी मार्टीन यांनी डाव सावरला. या दोघींनी ४३ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. अखेर राजश्री गायकवाडने जमलेली जोडी फोडली. फलंदाज मॅडी ग्रीन २४ धावांवर बाद झाली. लगेच केटी मार्टीनही २५ धावा करून माघारी परतली. त्यानंतर अमेलिया किर हिने तुफान फटकेबाजी केली. तिने ६ चौकार लगावत १९ चेंडूत नाबाद ३४ धावा केल्या. पण एका चेंडूत ५ धावा हव्या असताना अखेर न्यूझीलंडला ३ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. Their performances have won the Indian team plenty of fans this #T20WorldCup pic.twitter.com/tLYb2scvVm — T20 World Cup (@T20WorldCup) February 27, 2020 नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजी आमंत्रित केले. संघात पुनरागमन करणारी स्मृती मानधना ११ धावांवर त्रिफळाचीत झाली. स्मृती लवकर बाद झाल्यावर शफाली वर्मा आणि तानिया भाटीया यांनी दमदार फटकेबाजी करत भारताला सातव्या षटकात अर्धशतकी मजल मारून दिली. यष्टीरक्षक तानिया भाटीया फटकेबाजी करताना झेलबाद झाली आणि भारताला दुसरा धक्का बसला. तानियाने २५ चेंडूत २३ धावा केल्या. त्यानंतरच्या फलंदाजांनी निराशा केली. मुंबईकर जेमिमा ८ चेंडूत १० धावा करून माघारी परतली. गेल्या दोन सामन्यात अपयशी ठरलेल्या कर्णधार हरमनप्रीतही केवळ १ धाव करून ती बाद झाली. धडाकेबाज खेळी करणारी सलामीवीर शफाली वर्मा हिला अर्धशतकाने हुलकावणी दिली. तिने ४६ धावा केली. अनुभवी वेदा कृष्णमूर्ती फटका खेळताना चेंडू तिच्या पायावर आदळला. पंचांनी तिला बाद ठरवले नाही, त्यामुळे न्यूझीलंडने DRS चा आधार घेतला. त्यात तिला पायचीत घोषित करण्यात आले. ११ चेंडूत ८ धावा करणारी दिप्ती शर्मा मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात बाद झाली आणि भारताला सातवा धक्का बसला. त्यानंतर राधा यादवने फटकेबाजी करत भारताला १३३ धावांचा टप्पा गाठून दिला.