अखिल भारतीय निमंत्रित खो-खो स्पर्धा इचलकरंजीचे जयहिंद क्रीडा मंडळ आणि महिलांमध्ये बदलापूरच्या शिवभक्त क्रीडा मंडळाने जिल्हा खो-खो संघटना व समर्पण, नाशिक यांच्या वतीने येथे आयोजित अखिल भारतीय आमंत्रितांच्या स्पर्धेत विजेतेपद मिळविले. प्राथमिक साखळीतील पहिल्या चार संघांमध्ये उपांत्य सामने न खेळविता त्यांची अव्वल साखळी स्पर्धा खेळविली गेली. या चार संघांनी एकमेकाविरुद्ध खेळलेल्या सामन्यांच्या निकालाआधारे विजेते ठरविण्यात आले. त्यानुसार पुरूषांमध्ये जयहिंदने तीनपैकी दोन सामन्यात विजय, तर एका सामन्यात बरोबरी केली. पुण्याचा नवमहाराष्ट्र संघ आणि मुंबईचा महात्मा गांधी संघ यांनी प्रत्येकी एक विजय, एक बरोबरी आणि एक हार अशी कामगिरी केली. या दोघांनाही प्रत्येकी तीन गुण मिळाले. समान गुणसंख्या झाल्यामुळे या दोघांनाही संयुक्तपणे उपविजेते ठरविण्यात आले. चवथे स्थान ठाण्याच्या विहंग मंडळाने मिळविले. महिलांच्या अव्वल साखळीत बदलापूरच्या शिवभक्तने तीनही सामने जिंकले. ठाण्याच्या रा. फ. नाईक संघाने दोन विजय आणि एक पराभव झाल्याने चार गुणांच्या आधारे उपविजेतेपद, तर रत्नागिरीचे आर्यन मंडळ तिसरे आणि इचलकरंजीचे जयहिंद चवथे राहिले. विजेत्यांना महापौर अशोक मुर्तडक, विश्वास बँकेचे संस्थापक अध्यक्ष विश्वास ठाकूर, पालिका स्थायी समितीचे सभापती सलीम शेख, खो-खो संघटक व नगरसेवक शाहू खैरे, जिल्हा संघटनेचे अध्यक्ष रमेश भोसले आदींच्या हस्ते गौरविण्यात आले. वैयक्तिक कामगिरीबद्दल उत्कृष्ट संरक्षक म्हणून हर्षल हातणकर आणि प्रांजळ मगर, आRमक म्हणून सुयश गरगटे आणि ऐश्वर्या सावंत, तर सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू म्हणून विजय हजारे आणि प्रियंका भोपी यांना रोख पारितोषिक, प्रमाणपत्र आणि आकर्षक चषक देऊन सन्मानित करण्यात आले. राज्य संघटनेचे पदाधिकारी मंदार देशमुख, उमेश आटवणे यांसह सहकाऱ्यांनी स्पर्धेच्या आयोजनावर लक्ष ठेवले.