सिल्हेट : फलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीमुळे भारतीय संघाला शुक्रवारी महिलांच्या आशिया चषक ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेत पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानकडून पराभव पत्करावा लागला. निदा दारच्या (नाबाद ५६ धावा व २ बळी) अष्टपैलू खेळामुळे पाकिस्तानने १३ धावांनी विजय मिळवला. या पराभवामुळे भारतीय संघाची या स्पर्धेतील आणि पाकिस्तानविरुद्धची विजयाची मालिका खंडित झाली. भारताने यंदाच्या स्पर्धेतील सलग तीन सामने जिंकले होते. तसेच या दोन संघांमधील गेल्या पाचही ट्वेन्टी-२० सामन्यांत भारताने विजय नोंदवला होता. मात्र, शुक्रवारी झालेल्या सामन्यात भारताच्या फलंदाज आपली सर्वोत्तम कामगिरी करण्यात अपयशी ठरल्या. भारताची एकही फलंदाज ३० धावांचा टप्पा ओलांडू शकली नाही. या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ६ बाद १३७ अशी धावसंख्या केली आणि प्रत्युत्तरात भारताचा डाव १९.४ षटकांत १२४ धावांत आटोपला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तानच्या डावाची सुरुवात अडखळती झाली. त्यांची पॉवर-प्लेच्या सहा षटकांअंती ३ बाद ३३ अशी स्थिती होती. परंतु निदा दार (नाबाद ५६) आणि कर्णधार बिस्मा मरूफ (३२) यांनी चौथ्या गडय़ासाठी ७६ धावांची भागीदारी रचत पाकिस्तानचा डाव सावरला. बिस्माला रेणुका सिंहने बाद केल्यानंतरही निदाने एक बाजू लावून धरत पाकिस्तानला १४० धावांसमीप पोहोचवले. प्रत्युत्तरात भारताने ठरावीक अंतराने गडी गमावले. भारताच्या आघाडीच्या फलंदाज सलामीवीर स्मृती मानधना (१७), कर्णधार हरमनप्रीत कौर (१२) व जेमिमा रॉड्रिग्ज (२) अपयशी ठरल्या. मधल्या फळीतील दयालन हेमलता (२०) आणि रिचा घोष (२६) यांनी काहीशी झुंज दिली, परंतु त्यांना इतरांची साथ न लाभल्याने भारताला या स्पर्धेत पहिल्या पराभवाचा सामना करावा लागला. संक्षिप्त धावफलक पाकिस्तान : २० षटकांत ६ बाद १३७ (निदा दार नाबाद ५६, बिस्मा मरूफ ३२; दीप्ती शर्मा ३/२७, पूजा वस्त्रकार २/२३) विजयी वि. भारत : १९.४ षटकांत सर्ववाद १२४ (रिचा घोष २६, दयालन हेमलता २०; नशरा संधू ३/३०, निदा दार २/२३)