करोनामुळे आयपीएल २०२१ आणि टी-२० वर्ल्डकप २०२१ चा दुसरा भाग भारतात आयोजित करता आला नाही. बीसीसीआयला दोन्ही स्पर्धा यूएईमध्ये आयोजित कराव्या लागल्या. आता बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने हा वाईट टप्पा संपला असून भारतातील आगामी स्पर्धेला बाधा येणार नाही, असा विश्वास व्यक्त केला आहे.

न्यूज १८शी बोलताना गांगुली म्हणाला, “मला वाटते की आपण वाईट टप्पा पार केला आहे. आशा आहे, की पुढच्या वर्षी आयपीएल भारतात परत आणू शकतो, कारण ही भारताची स्पर्धा आहे. आणि जेव्हा ती भारतात खेळली जाते, तेव्हा ते वेगळे वातावरण असते. आंतरराष्ट्रीय क्रिकेट सुरू आहे. आम्ही न्यूझीलंडचे यजमानपद भूषवले. आम्ही दक्षिण आफ्रिकेला जाणार आहोत. त्यानंतर वेस्ट इंडिज आणि श्रीलंका संघ येईल. त्यामुळे मला वाटते की वाईट काळ संपला आहे.”

हेही वाचा – सचिन, द्रविडसह इतर खेळाडूंना मिळाला होता मॅचपूर्वी SEX करण्याचा सल्ला; भारताच्या माजी प्रशिक्षकाचा खुलासा!

सौरव गांगुली म्हणतो, “करोनाच्या सर्व समस्या असतानाही आयपीएल दुबईला घेऊन आम्ही ही स्पर्धा पूर्ण करू शकलो. आमचे देशांतर्गत क्रिकेट पूर्वीप्रमाणेच पूर्ण प्रवाहात आहे. गेल्या वर्षी ब्रेक होता. आम्ही जवळजवळ प्रत्येक स्पर्धा पूर्ण केली आहे. रणजी करंडक जानेवारीपासून सुरू होत आहे. ज्युनियर क्रिकेट सुरू आहे. विजय हजारे ट्रॉफी सध्या भारतात सुरू आहे.”

महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात खेळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जने आयपीएल २०२१ स्पर्धेचे जेतेपद पटकावले. आता पुढील हंगामासाठी मेगा ऑक्शन होणार असल्याने सर्व संघांची आणि त्यातील प्रमुख नवीन खेळाडूंची जागा बदलणार आहे.