मँचेस्टर कसोटी रद्द केल्यापासून, इंग्लंड क्रिकेट बोर्ड आणि त्यांचे माजी खेळाडू खूप दुखावलेले दिसत आहेत. याच कारणामुळे, भारतीय खेळाडूंना लक्ष्य केले जात आहे. इंग्लंडचे माजी कर्णधार डेव्हिड गावर यांनी विराट कोहलीबाबत धक्कादायक विधान केले आहे. गावर यांनी थेट टीम इंडियाच्या प्रामाणिकपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. गावरचा यांचा असा विश्वास आहे, की आयपीएल २०२१च्या दृष्टीने टीम इंडियाने मँचेस्टर कसोटी रद्द केली.

क्रिकेट डॉट कॉमशी केलेल्या संभाषणात गावर म्हणाले, ”मी मॅन्चेस्टरला टेस्ट मॅच पाहण्यासाठीही आलो होतो, मात्र शेवटच्या क्षणांमध्ये मॅच रद्द करण्यात आली होती. आम्ही असे अनेक सामने पाहिले जे रद्द करण्यात आले. काही चेंडू टाकले जाऊ शकतात किंवा ते इतर काही कारणास्तव रद्द केले जाऊ शकतात. पण हा सामना शेवटच्या क्षणी रद्द करण्यात आला. या मॅचच्या एक दिवस आधी मध्यरात्री विराट कोहलीने बीसीसीआयला ईमेल केला. ही बाब अधिक स्पष्ट करणे आवश्यक आहे.”

हेही वाचा – टी-२० वर्ल्डकपसाठी सर्व संघ झाले जाहीर; एका क्लिकवर वाचा यादी

गावर पुढे म्हणाले, ”ही चिंतेची बाब आहे की आयपीएल जवळ असताना कसोटी सामना रद्द करण्यात आला आहे. मला विराट कोहलीचे वक्तव्य आठवते ज्यात त्याने म्हटले होते, की कसोटी सामना माझ्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट आहे. कसोटी सामना आपल्या सर्वांसाठी महत्त्वाचा आहे आणि मँचेस्टर कसोटी रद्द होणे दुर्दैवी आहे.”

”आगामी काळात आणखी बऱ्याच गोष्टी समोर येतील. पण लवकरच भारतीय खेळाडू आयपीएलसाठी यूएईला गेले आणि त्यांनी तयारीला सुरुवात केली. आयपीएल आणि मँचेस्टर कसोटी रद्द करण्यामध्ये कुठेतरी निश्चितपणे संबंध आहे”, असेही गावर म्हणाले.