भारताचा युवा मल्ल नरसिंग यादवने ऑलिम्पिकसाठी भारताला कोटा मिळवून दिला आहे. पण ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व नरिसंग करणार की भारताला दोन पदके मिळवून देणारा सुशील कुमार याबाबत संदिग्धता आहे. पण यामध्ये कोणताही वाद नसल्याचे मत सुशील कुमारने व्यक्त केले आहे.

‘‘नरसिंग हा चांगला मल्ल आहे, त्याने ऑलिम्पिकचा कोटाही देशाही मिळवून दिला आहे. पण ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व कोण करणार, याबाबत निश्चतता नसली तरी यामध्ये कोणताच वाद नाही,’’ असे सुशीलने सांगितले.

तो पुढे म्हणाला की, ‘‘नरसिंगने देशासाठी फार चांगले काम केले आहे. पण ऑलिम्पकमध्ये कोण जाणार, याचा निर्णय भारतीय महासंघ घेणार आहे. त्यासाठी आम्ही दोघांमध्ये सामना खेळवण्यात येणार असून त्यासाठी मी सज्ज आहे.’’