अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्य माघारी गेल्यानंतर तालिबानची क्रूरता वाढत आहे. तालिबान एकापाठोपाठ एक अफगाणिस्तानच्या अतिशय महत्त्वाच्या ठिकाणांवर वेगाने ताबा मिळवत आहे. टोलो न्यूजनुसार, तालिबान लढाऊंनी भारताने अफगाणिस्तानात बांधलेल्या देलाराम-जरंज महामार्गावरही ताबा मिळवला आहे. दरम्यान,तालिबानशी तीव्र लढाई दरम्यान भारताने आज आपल्या नागरिकांना अफगाणिस्तान सोडण्यास सांगितले आहे. अशातच अफगाफिनीस्तानचा गोलंदाज राशिद खानने जगभरातल्या नेत्यांकडे मदतीसाठी विनंती केली आहे.

राशिद खानने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन जगभरातील नेत्यांकडे मदत मागितली आहे. “प्रिय जागतिक नेत्यांनो! माझा देश अराजकातेत आहे. मुले आणि महिलांसह हजारो निष्पाप लोक दररोज शहीद होत आहेत. घरे आणि मालमत्ता नष्ट होत आहे. हजारो कुटुंबे विस्थापित होत आहेत. आम्हाला संकटात टाकू नका. अफगाणांना मारणे आणि अफगाणिस्तानचा नाश करणे थांबवा. आम्हाला शांतता हवी आहे,” असे त्याने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

तालिबानने आतापर्यंत सहा प्रांतीय राजधानी ताब्यात घेतल्या आहेत. दरम्यान, भारत सरकारने अफगाणिस्तानचे चौथे मोठे शहर मजार-ए-शरीफ येथून आपले मुत्सद्दी आणि नागरिकांना बाहेर काढण्याचा निर्णय घेतला आहे. या भागात मंगळवारी संध्याकाळी अफगाणिस्तानातील उत्तर शहर मजार-ए-शरीफ येथून एक विशेष विमान नवी दिल्लीला रवाना होणार आहेत.

अफगाणिस्तानच्या बल्ख आणि तखार प्रांतात तालिबान लढाऊ आणि अफगाण सुरक्षा दलांमध्ये तीव्र लढाई दरम्यान हा निर्णय घेण्यात आला आहे. तालिबानने अलीकडेच उत्तर बल्खचे अनेक भाग काबीज केले. आता त्यांचे लक्ष्य मजार-ए-शरीफ आहे. मजार-ए-शरीफ बाल्ख प्रांताची राजधानी आणि अफगाणिस्तानमधील चौथे मोठे शहर आहे.