भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पंड्याला सध्या त्याच्या तंदुरुस्तीवर लक्ष केंद्रित करायचे आहे, म्हणूनच त्याने मोठा निर्णय घेतला आहे. हार्दिकने राष्ट्रीय निवड समितीला एक संदेश दिला आहे. ”फिटनेस साधण्यावर लक्ष केंद्रित करणार असल्याने आगामी क्रिकेट मालिकेसाठी माझा विचार करू नये”, असे हार्दिकने म्हटले. पाठीच्या दुखापतीमुळे २०१९ मध्ये झालेल्या शस्त्रक्रियेनंतर पंड्या भारत आणि मुंबई इंडियन्स या दोन्ही संघांसाठी गोलंदाजी करू शकला नाही.

क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, हार्दिकचे लक्ष गोलंदाजीमध्ये पुनरागमन करण्यावर आहे आणि त्याने निवड समितीला वेळ देण्यास सांगितले आहे. पंड्या हा टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाचा भाग होता, पण तो ५ सामन्यांत फक्त दोनदा गोलंदाजी करू शकला. ज्यामध्ये त्याला यश मिळाले नाही.

हेही वाचा – IND vs NZ : ‘‘अच्छा तो हम चलते है…”, रहाणे-पुजारा पुन्हा फ्लॉप; नेटकऱ्यांनी दिला ‘असा’ निरोप!

टी-२० विश्वचषकापूर्वी, आयपीएलमध्ये पंड्याच्या फिटनेसवर सतत लक्ष ठेवण्यात आले होते, परंतु स्पर्धेच्या दोन्ही टप्प्यांतील एकाही सामन्यात त्याने गोलंदाजी केली नाही. २०१९ मध्ये त्याने आयपीएलमध्ये शेवटची गोलंदाजी केली होती आणि तो २०२०चा हंगाम फलंदाज म्हणून खेळला होता. फिटनेसमुळे पांड्याला न्यूझीलंडविरुद्ध नुकत्याच झालेल्या तीन टी-२० मालिकेसाठी संघात निवडण्यात आले नाही आणि आता तो दक्षिण आफ्रिका दौऱ्याचाही भाग नसल्याचे समोर आले आहे.

भारताचे माजी कप्तान कपील देव यांनीही हार्दिकबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. ”हार्दिक पंड्याला अष्टपैलू म्हणता येईल का? त्याला अष्टपैलू म्हणायचे असेल, तर दोन्ही गोष्टी कराव्या लागतील”, असे कपील देव यांनी म्हटले होते.