टीम इंडियाच्या आघाडीच्या फळीतील वरिष्ठ फलंदाज सलग दुसऱ्या डावात अपयशी ठरले. पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात भारतीय संघाने ३४५ धावा केल्या. न्यूझीलंडचा संघ पहिल्या डावात २९६ धावा करू शकला. अशा प्रकारे भारताला ४९ धावांची महत्त्वाची आघाडी मिळाली. आज रविवारी सामन्याच्या चौथ्या दिवशी दुसऱ्या डावात टीम इंडियाने ५१ धावांत ५ विकेट गमावल्या होत्या. संघाचा कप्तान अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा पुन्हा एकदा आपली छाप पाडण्यात अपयशी ठरले.

अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा दोन्ही डावात चांगली कामगिरी करू शकले नाहीत. त्यांचा बऱ्याच दिवसांपासून सुरू असलेला खराब फॉर्मचा काळ अजूनही सुरूच आहे. या दोघांच्या फ्लॉप शोवर चाहत्यांची प्रतिक्रिया पाहा…

हेही वाचा – VIDEO : ‘‘I am so SORRY…”, भारताच्या विकेटकीपरनं कॅमेऱ्यासमोर अश्विनची मागितली माफी; नक्की घडलं काय?

पहिल्या कसोटीत अजिंक्य रहाणे कर्णधार आहे. पहिल्या डावात त्याने ३५ तर दुसऱ्या डावात केवळ ४ धावा केल्या. पहिल्या डावात त्याला टिम साऊदीने बाद केले, तर दुसऱ्या डावात डावखुरा फिरकी गोलंदाज एजाज पटेलने त्याला बाद केले. २०१७ पासून अजिंक्य रहाणे घरच्या मैदानावर २८ पैकी २० वेळा फिरकी गोलंदाजांविरुद्ध बाद झाला आहे. यावरून तो फिरकीपटूंसमोर अडचणीत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
चेतेश्वर पुजाराने पुजाराने पहिल्या डावात २६ तर दुसऱ्या डावात २२ धावा केल्या. पहिल्या डावात साऊदीने त्याला बाद केले. दुसऱ्या डावात काईल जेमीसनने त्याला पॅव्हेलियनमध्ये पाठवले.