ऑस्ट्रेलियाचा संघ यजमान इंग्लंडला पराभूत करून मंगळवारी उपांत्य फेरीत पोहोचला. या स्पर्धेत उपांत्य फेरी गाठणारा ऑस्ट्रेलिया पहिला संघ ठरला. भारतीय संघदेखील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत उत्तम कामगिरी करत आहे. भारताने ५ पैकी ४ सामने जिंकून ९ गुण कमावले आहेत. भारताचा न्यूझीलंडविरुद्धचा सामना मात्र पावसामुळे रद्द करण्यात आला. त्यामुळे भारत सध्या गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी विराजमान आहे. पण एका बाबतीत मात्र भारतीय संघ तळाशी आहे आणि ही गोष्ट भारतासाठी आणि भारतीय क्रिकेटरसिकांसाठी सुखावह आहे.

‘कॅचेस विन मॅचेस’ अशी क्रिकेटमधील एक म्हण आहे. संघातील खेळाडू जितके जास्त झेल टिपतात, तितका तो संघ सामना जिंकण्याची शक्यता देखील वाढते. यंदाच्या विश्वचषक स्पर्धेतदेखील ही म्हण खरी ठरताना दिसते आहे. विश्वचषक स्पर्धा २०१९ मध्ये झेल सोडण्याच्या बाबतीत पाकिस्तानचा संघ अव्वल स्थानी आहे. पाकच्या संघाकडून आतापर्यंत एकूण १४ झेल सुटले आहेत. तर या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी केवळ १ झेल सोडला आहे.

या यादीत दुसऱ्या क्रमांकावर इंग्लंडचा संघ आहे. इंग्लंडच्या संघाने आतापर्यंत १२ झेल सोडले आहेत. तर त्या खालोखाल न्यूझीलंडच्या संघाने एकूण ९ झेल सोडले आहेत. पहिल्याच फेरीत धक्कादायक ‘एक्झिट’ घेणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाकडून ८ झेल सुटले आहेत, तर विंडीजकडून ६ झेल सुटले आहेत. ऑस्ट्रलिया आणि बांगलादेश या दोघांच्या आतापर्यंतच्या कामगिरीमध्ये खूप फरक असला तरी त्यांनी या बाबतीत मात्र साम्य राखले आहे. या दोनही संघाकडून एकूण ४ झेल सुटले आहेत. तर श्रीलंकेकडून ३ आणि अफगाणिस्तानकडून केवळ २ झेल सुटले आहेत.

प्रत्येक संघाने सोडलेले झेल –

पाकिस्तान – १४
इंग्लंड – १२
न्यूझीलंड – ९
दक्षिण आफ्रिका – ८
विंडीज – ६
ऑस्ट्रलिया – ४
बांगलादेश – ४
श्रीलंका – ३
अफगाणिस्तान – २
भारत – १