महाराष्ट्राने १९ वर्षांखालील मुलींच्या गटात ४ बाय १०० मीटर रिले शर्यत स्पर्धा विक्रमासह जिंकली आणि ५८ व्या राष्ट्रीय शालेय जलतरण स्पर्धेत उद्घाटनाचा दिवस गाजविला. त्यांनी हे अंतर ४ मिनिटे ५३.१४ सेकंदांत पार केले.
शालेय क्रीडा महासंघ व आंतरकचेरी क्रीडा संघटना यांनी आयोजित केलेल्या या स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी एकूण चार रिले शर्यतीत सुवर्णवेध घेतला. १४ वर्षांखालील मुले (४ मिनिटे ४५.७७ सेकंद), मुली (५ मिनिटे ६०.०२ सेकंद) १७ वर्षांखालील मुली (४ मिनिटे ५८.५६ सेकंद) या गटातही महाराष्ट्रास विजेतेपद मिळाले. महाराष्ट्राची आंतरराष्ट्रीय खेळाडू आकांक्षा व्होरा हिने मुलींच्या १७ वर्षांखालील गटात ४०० मीटर फ्री-स्टाईल शर्यतीत सोनेरी कामगिरी केली. तिने ही शर्यत ४ मिनिटे ४५.१२ सेकंदांत पार केली. तिचीच सहकारी अंतरा अगरवाल हिने रौप्यपदक मिळविले.