नॉटिंगहॅम कसोटीच्या दुसऱ्या दिवशी अंधुक सूर्यप्रकाश आणि पावसामुळे दुसऱ्या दिवशी ३३.४ षटकांचाच खेळ झाला. मात्र २०२ बॉलमध्ये चाहत्यांना खूप काही पाहायला मिळाले. दमदार सलामी दिल्यानंतरही पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवसअखेर भारताची ४ बाद १२५ धावा अशी अवस्था झाली. केएल राहुलने अर्धशतक पूर्ण केले पण त्यानंतर भारताचे ४ मोठे फलंदाज अवघ्या १५ धावांच्या आत बाद झाले. भारताची पहिली विकेट ९७ धावांवर पडली, पण ११२ धावांपर्यतं पोहोचताना संघाने चेतेश्वर पुजारा, विराट कोहली आणि अजिंक्य रहाणेच्या विकेटही गमावल्या. यानंतर यष्टीरक्षक ऋषभ पंतने मैदानावर पाऊल टाकताच इंग्लंडविरुद्ध आक्रमण धोरण स्वीकारले. पंतचा हा विचार वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लाराला खूप आवडला आणि त्यानेही ट्विट करून समर्थन दर्शवले आहे.

ब्रायन लाराने ट्विट करत, ‘बस एवढेच ऋषभ पंत त्यांच्यावर अटॅक कर!! स्कोअरबोर्डवर टिक करत रहा, असे म्हटले आहे. पंतने जेम्स अँडरसनच्या चेंडूवर एरियल शॉट खेळून आपले खाते उघडल्यानंतर महान फलंदाज ब्रायन लाराने हे ट्विट केले.

पंतच्या या शॉटने कॉमेंट्री करणाऱ्या माजी क्रिकेटपटूंना देखील आश्चर्य वाटले. अँडरसनने याआधी चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहलीला सलग दोन चेंडूंवर माघारी पाठवले होते. रहाणेही धावबाद झाला होता. त्यानंतर पंत मैदानावर आला. भारताची फलंदाजी ढेपाळल्याने पंत स्थिरावण्याचा प्रयत्न करेल असे सर्वांना वाटत होते पण त्याने येताच आक्रमकपणे खेळण्यास सुरुवात केली आहे. दुसऱ्या सत्रात खेळ थांबवण्यात आला, तेव्हा राहुलच्या साथीने यष्टीरक्षक ऋषभ पंत ७ धावांवर खेळत होता. भारत पहिल्या डावात अद्याप ५८ धावांनी पिछाडीवर आहे.