अहमदाबाद : यजुर्वेद्र चहल (४/४९) आणि वॉशिंग्टन सुंदर (३/३०) या फिरकीपटूंनी केलेल्या प्रभावी गोलंदाजीमुळे १०००व्या एकदिवसीय सामन्यात भारताने वेस्ट इंडिजला सहा गडी आणि १३२ चेंडू राखून धूळ चारली. या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. विंडीजने दिलेले १७७ धावांचे लक्ष्य भारताने कर्णधार रोहित शर्मा (६० धावा), सूर्यकुमार यादव (नाबाद ३४) आणि पदार्पणवीर दीपक हुडा (नाबाद २६) यांच्या योगदानामुळे २८ षटकांत गाठले. उभय संघांतील दुसरी लढत बुधवारी खेळवण्यात येईल. प्रथम फलंदाजी करताना जेसन होल्डरने (५७) अर्धशतकी झुंज दिल्यामुळे विंडीजला किमान तीन आकडी धावसंख्या गाठता आली.