दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आज दुसरा ट्वेन्टी-२० सामना

सुरत : कर्णधार हरमनप्रीतच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ गुरुवारी होणाऱ्या दुसऱ्या ट्वेन्टी-२० क्रिकेट सामन्यात दक्षिण आफ्रिकेला धूळ चारून मालिकेत २-० अशी आघाडी घेण्याच्या निर्धाराने मैदानात उतरणार आहे.

पाच सामन्यांच्या या मालिकेतील मंगळवारी झालेल्या पहिल्या लढतीत भारताने आफ्रिकेला ११ धावांनी पराभूत केले होते. दीप्ती शर्माच्या प्रभावी फिरकीच्या बळावर भारताने १३० धावांचा यशस्वी बचाव केला होता. दीप्तीने कारकीर्दीतील सर्वोत्तम कामगिरीची नोंद करताना तीन षटके निर्धाव टाकतानाच आठ धावांत तीन बळी मिळवण्याची किमया साधली. तिच्याव्यतिरिक्त, पूनम यादव आणि राधा यादव यांच्या उपयुक्त योगदानामुळे भारताची गोलंदाजांची फळी सक्षम आहे.

भारताला फलंदाजीची चिंता तीव्रतेने भेडसावत आहे. पहिल्या लढतीत हरमनप्रीत वगळता एकीलाही २५हून अधिक धावा करता आल्या नाही. विशेषत: १५ वर्षीय शेफाली वर्मा पदार्पणाच्याच लढतीत भोपळाही फोडू शकली नाही. तर स्मृती मानधना आणि जेमिमा रॉड्रिग्जही फारशी चमक दाखवू शकली नाही. त्यामुळे या लढतीत त्यांनी जबाबदारीने फलंदाजी करून मधल्या फळीवरील दडपण कमी करण्याची आवश्यकता आहे.

आफ्रिकेतर्फे पहिल्या सामन्यातील अर्धशतकवीर मिगनॉन डूप्रीझ आणि तीन बळी मिळवणारी शबनिम इस्माइल कामगिरीत सातत्य राखण्यासाठी उत्सुक असतील.

’ सामन्याची वेळ : सायंकाळी ७ वा.

’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स ३