अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे निर्णय

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘फिफा’ची कुमार विश्वचषक फुटबॉल स्पर्धा किती यशस्वी होईल, या प्रश्नाचे उत्तर आता देणे कठीण आहे. मात्र या स्पर्धेने भारताला भविष्याची दिशा दिली. आत्तापर्यंत ‘निद्रिस्त ज्वालामुखी’ अशी आपली ओळख करून दिली जात होती. पण विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद मिळाल्यापासून ते आत्तापर्यंत भारतीय फुटबॉलविश्व प्रचंड बदलले आहे. त्यात वरिष्ठ स्तरावरील भारताची सुधारलेली कामगिरी, याचाही महत्त्वाचा वाटा आहे. कुमार विश्वचषक स्पर्धेत यजमान म्हणून खेळण्यापूर्वी कनिष्ठ स्तरावरील खेळाडूंचा गांभीर्याने विचार झालेला पाहिलाच नाही. त्यांच्या स्पर्धा अक्षरश: उरकल्या जायच्या. पण मागील २-३ वर्षांत त्यांनाही महत्त्व प्राप्त झाले. विश्वचषक स्पर्धेला साजेसा संघ उभा करण्यासाठी अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (एआयएफएफ) देशाची सीमा ओलांडून होतकरू युवा खेळाडूंचा शोध घेतला, देशाचा कानाकोपरा पिंजून काढला. जवळपास १४ हजार खेळाडूंमधून अंतिम २८ आणि आता सर्वोत्तम २१ खेळाडू या स्पर्धेसाठी निवडले.

विश्वचषक स्पर्धा संपल्यानंतर खरे आव्हान आहे. या खेळाडूंच्या भविष्याचे काय? परदेशातील क्लब संस्कृतीच्या मोहात हेही खेळाडू कालांतराने गायब होतील की सातत्य राखून देशाचे प्रतिनिधित्व करतील? विश्वचषक स्पर्धेनंतर या खेळाडूंसाठी योग्य व्यासपीठ असेल का? या सर्व प्रश्नांची उत्तरे एआयएफएफने शोधली आहेत. कुमार विश्वचषक स्पर्धेच्या निमित्ताने आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघासोबत (फिफा) जुळलेल्या योगातून महासंघाने बरेच काही शिकून घेतले. त्यामुळेच भारतातील या सर्वोत्तम २१ कुमार फुटबॉलपटूंच्या भविष्याच्या योग्य वाटचालीसाठी त्यांनी काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. या खेळाडूंना इंडियन सुपर लीग (आयएसएल) पासून दूर ठेवण्याचा महासंघाने घेतलेला निर्णय अतिमहत्त्वाचा म्हणावा लागेल. या स्पर्धेनंतर आयएसएलमधील बरेच क्लब खेळाडूंना करारबद्ध करण्यासाठी हालचाली करतील, याची जाण महासंघाला होती. खेळाडू थोडय़ाशा लोभापाई भरकटू नयेत म्हणून महासंघाने त्यांच्याशी पुढील २-३ वर्षांचा करार केला. या करारानुसार हे २१ खेळाडू पुढील काही वर्षे एक संघ म्हणूनच कायम सोबत खेळणार आहेत. भविष्याचा मजबूत भारतीय युवा संघ तयार करण्याच्या दृष्टीने हे सकारत्मक पाऊल आहे. त्यासाठी १७ व १९ वर्षांखालील खेळाडूंचा एक सयुंक्त संघ आय-लीगमध्ये खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा संघ दिल्लीचे प्रतिनिधित्व करणार असून त्याच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

आयएसएलमध्ये हे खेळाडू वेगवेगळ्या क्लबसोबत खेळण्यापेक्षा ते संपूर्ण परिपक्व होइपर्यंत एकत्र खेळावेत हा या निर्णयामागचा मुख्य हेतू आहे. आयएसएलमध्ये त्यांना खेळण्याची संधी मिळेलच याची शाश्वती नाही. पण आय-लीगच्या माध्यमातून त्यांना जास्तीतजास्त सामने खेळता येतील .

– हेन्री मेनीझेस, एआयएफएफच्या तांत्रिक समितीचे उपकार्याध्यक्ष

मातोस यांच्या करारात वाढ?

निकोलस अ‍ॅडम यांच्या हकालपट्टीनंतर भारताच्या कुमार संघाची जबाबदारी पोर्तुगालच्या लुईस नॉर्टन डी मॅटोस यांच्याकडे सोपवण्यात आली. ७-८ महिन्यांपासून ते संघासोबत आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली संघ सातत्याने चांगली कामगिरी करत आहेत. हीच बाब लक्षात घेता डी मॅटोस यांचा करार २-३ वर्षे वाढवण्याची शक्यता आहे.

लक्ष्य २०१९चा २० वर्षांखालील विश्वचषक

कुमार विश्वचषक स्पर्धेच्या यजमानपदानंतर महासंघाने २०१९मध्ये होणाऱ्या युवा ( २० वर्षांखालील) विश्वचषक स्पर्धेसाठी महासंघाने कंबर कसली आहे. हेच लक्ष्य डोळ्यांसमोर ठेवून कुमार गटातील खेळाडूंना एकत्र खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अजूनही देशातील सर्वोत्तम खेळाडूंची निवड केली जाणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian football federation to keep away players from indian super league
First published on: 08-10-2017 at 04:51 IST