क्रीडा
हृषीकेश बामणे – response.lokprabha@expressindia.com
वयाची तिशी ओलांडलेल्या खेळाडूंनी यंदाची आयपीएल गाजवली. त्यातही चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या शिलेदारांनी तिसऱ्यांदा बाजी मारली. आयपीएलच्या विशेष घडामोडी आणि आकडेवारीवर टाकलेली एक नजर.

उन्हाळाच्या सुट्टीत प्रेक्षकांना मनोरंजन म्हणून एक उपलब्ध असलेले साधन म्हणजे आयपीएल. ७ एप्रिलपासून सुरू झालेला क्रिकेटचा हा सोहळा ५१ दिवस, ६० सामने आणि आठ सर्वोत्कृष्ट संघांमध्ये रंगला. यामध्ये खेळाडूंच्या कामगिरीवर नजर फिरवल्यास एक गोष्ट आढळून आली ती म्हणजे प्रत्येक संघातील अनुभवी खेळाडूने एखाद्या युवालाही लाजवील अशी कामगिरी केली. चेन्नईचे महेंद्रसिंग धोनी (३६ वष्रे), शेन वॉटसन (३६), अंबाती रायुडू (३२) आणि ड्वेन ब्राव्हो (३४), सनरायझर्स हैदराबादचे शिखर धवन (३२) व शाकिब अल हसन (३१), किंग्ज इलेव्हन पंजाबचे ख्रिस गेल (३८) व अँड्रय़ू टाय (३१), रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुचा एबी डी’व्हिलियर्स (३४) व उमेश यादव (३०), कोलकाता नाइट रायडर्सचा दिनेश काíतक (३२) व आंद्रे रसेल (३०) ही मंडळी या यादीत चपखलपणे बसतात.

सर्वाधिक धावा काढणाऱ्यांच्या यादीतील ३० वर्षांवरील फलंदाज (पहिल्या दहांमधील)

अंबाती रायुडू (१६ सामने, ६०२ धावा, सरासरी ४३)
शेन वॉटसन (१५ सामने, ५५५ धावा, सरासरी ३९)
दिनेश काíतक (१६ सामने, ४९८ धावा, सरासरी ४९)
शिखर धवन (१६ सामने, ४९७ धावा, सरासरी ३८)

सर्वाधिक बळी घेणाऱ्यांच्या यादीतील ३० वर्षांवरील गोलंदाज (पहिल्या दहांमधील)

अँड्रय़ू टाय (१४ सामने, २४ बळी)
उमेश यादव (१४ सामने, २० बळी)
सुनील नरिन (१६ सामने, १७ बळी)

भारतीय युवांची छाप

गेले वर्ष भारतीय खेळाडूंना चांगले नव्हते गेले मात्र, यंदा त्यांनी आपली कामगिरी उंचावली. विशेष म्हणजे भारताच्या दुसऱ्या फळीने आपापल्या संघासाठी उल्लेखनीय योगदान दिले. ऋषभ पंत, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, संजू सॅम्सन यांनी फलंदाजीत तर सिद्धार्थ कौल, हार्दकि पंडय़ा, कुलदीप यादव, दीपक चाहर यांनी सुरेख गोलंदाजी करीत सर्वाना प्रभावित केले. भारतातर्फे पंत (६८४ धावा) आणि राहुल (६५९) यांनी अनुक्रमे १४ सामन्यात सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत दुसरे व तिसरे स्थान काबीज केले. त्याचप्रमाणे सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्यांच्या यादीतही या युवांनी आपला नंबर लावला आहे.

सर्वाधिक षटकार (पहिले पाच खेळाडू)

खेळाडू           सामने      षटकार
ऋषभ पंत        १४            ३७
शेन वॉटसन     १५            ३५
अंबाती रायुडू    १५            ३४
लोकेश राहुल    १४            ३२
आंद्रे रसेल        १६            ३१

सर्वाधिक बळी घेणारे भारतीय गोलंदाज (पहिल्या दहांमधील)

खेळाडू              सामने      बळी
सिद्धार्थ कौल      १७           २१
उमेश यादव       १४           २०
हार्दकि पंडय़ा     १३           १८
जसप्रीत बुमरा   १४           १७
कुलदीप यादव   १६           १७

शतकवीर

यंदाच्या हंगामात एकूण पाच शतके झळकावली गेली. त्यातही अपेक्षेप्रमाणे अनुभवी खेळाडूंनी बाजी मारली. ऋषभ पंत हा एकमेव भारतीय या यादीत ३० वर्षांखालील खेळाडू ठरला. चेन्नईच्या रायुडू आणि वॉटसन या दोन्ही सलामीवीरांनी यंदा शतक फाटकावले. एकाच संघाच्या दोन्ही सलामीवीरांनी शतक झळकावण्याची ही पहिलीच खेप ठरली. वॉटसनने दोन तर, रायुडू, गेल आणि पंत यांनी प्रत्येकी एक शतक ठोकले.

फिरकीपटूंचे वर्चस्व

आपल्या जादूई फिरकीच्या जोरावर यंदा अनेक फिरकीपटूंनी भल्या-भल्या फलंदाजांना चकवले. त्यातही लेग स्पिनर्सने यंदाची आयपीएल गाजवली. हैदराबादचा रशीद खान (२१ बळी) पंजाबचा मुजीब उर रहमान (१४), बंगळूरुचा युजवेंद्र चहल (१२), कोलकात्याचा कुलदीप यादव (१७), मुंबईचा मयांक मरकडे (१५) आणि राजस्थानचा श्रेयस गोपाळ (११) यांची गोलंदाजी पाहताना सर्वानीच मजा लुटली. अफगाणिस्तानच्या रशीद आणि मुजीबवर तर चोहीकडून कौतुकाचा वर्षांव झाला. त्यामुळे त्यांचे भविष्य उज्ज्वल आहे याची खात्री क्रीडाजगतला पटली. विशेष म्हणजे उभय सर्व गोलंदाजांनी संपूर्ण स्पध्रेत किमान एकदा तरी सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार पटकावलेला आहे.

कारकीर्दीचा शेवट?

आयपीएलच्या सुरुवातीलाच यंदा भारताच्या तसेच विदेशातील अनेक नावाजलेल्या खेळाडूंच्या कामगिरीवर सर्वाच्या नजर खिळल्या होत्या. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चेंडू फेरफार प्रकरणात दोषी आढळल्यामुळे ऑस्ट्रेलियाचे दोन प्रमुख फलंदाज कर्णधार स्टिव्ह स्मिथ आणि उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर यांना एका वर्षांसाठी निलंबित करण्यात आल्यामुळे त्यांच्या आयपीएलमधील भवितव्यावर प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. याशिवाय गौतम गंभीर, युवराज सिंग, हरभजन सिंग यांनाही आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी यंदा करता आली नाही. खराब प्रदर्शनामुळे गंभीरने तर स्पध्रेच्या मध्यातच दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाचे कर्णधारपद सोडले. तर युवराज आणि हरभजन यांनाही ठरावीक सामन्यातच संघात गहभागी करण्यात आले. त्यामुळे या खेळाडूंना पुढील आयपीएलमध्ये खेळताना पाहायला मिळणार का, हा प्रश्न अनेकांना भेडसावत आहे.

त्यातही सर्वात धक्कादायक बातमी म्हणजे मैदानाच्या चारही बाजूंना सहजतेने फटके लगावणारा एबी डी’व्हिलियर्स आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधूनच निवृत्त झाला. त्यामुळे त्याची अप्रतिम फटकेबाजी पाहण्याची संधी चाहत्यांना पुन्हा मिळणार की नाही याबाबत क्रिकेट रसिक साशंक आहेत. आहे. हैदराबाद विरुद्धच्या एका सामन्यात त्याने सीमारेषेजवळ स्पायडरमॅन सारखा सूर मारून एकहाती झेल घेतला होता तेव्हा संपूर्ण क्रिकेट विश्व आश्चर्याने स्तब्ध झाले होते.

कर्णधारच सबकुछ

असे म्हणतात की कर्णधाराने त्याच्या पदाला साजेशी कामगिरी केली की संघाचीही आपोआपच प्रगती होते. याचेच उत्तम उदाहरण म्हणजे अंतिम फेरीत पोहोचलेले दोन्ही संघाचे कर्णधार महेंद्रसिंग धोनी (चेन्नई) आणि केन विल्यम्सन (हैदराबाद) यांची कामगिरी. विल्यम्सनने सर्वाधिक धावा करताना (७३५) ऑरेंज कॅप पटकावली तर, धोनीने (४५५) नेहमीप्रमाणे आपल्या मिडास स्पर्शाने संघाच्या विजयात मोलाचा हातभार लावला. दिनेश काíतकने सुद्धा कोलकात्यासाठी सर्वाधिक धावा करताना (४९८) संघाला बाद फेरीत पोहचवण्यात खारीचा वाट उचलला. रोहित शर्माला (२८६) यंदा अपयश आल्याने मुंबईचा संघ पाचव्या स्थानी राहिला. तर रविचंद्रन अश्विन आणि गंभीर यांच्या अपयशाचा फटका संघालाही भोगावा लागला. विराट कोहली मात्र याबाबतीत दुर्दैवी ठरला. ५३० धावांसह ऑरेंज कॅपच्या शर्यतीत सातवा क्रमांक मिळवून सुद्धा बंगळूरुचा संघ गुणतालिकेत सहाव्या स्थानावर राहिला.

ऑरेंज कॅप ‘अनलकी’?

सर्वाधिक धाव बनवणाऱ्या खेळाडूला देण्यात येणारी ऑरेंज कॅप संघाला विजेतेपद मिळवून देण्यात मात्र अपयशी ठरत आहे. २०१४ साली रॉबिन उथप्पाने ६६० धावांसह ऑरेंज कॅप जिंकली. फक्त त्याच वर्षी कोलकाताला विजेतेपद मिळाले. अन्यथा ऑरेंज कॅप जिंकलेल्या खेळाडूचा संघ पराभूत झालेला दिसतो. एकूणच युवा खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या आयपीएलमध्ये आजही अनुभवाची शिदोरीच सरस ठरत आहे, हे सिद्ध होते.
सौजन्य – लोकप्रभा