भारतीय संघाचा जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराहने, श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतून दमदार पुनरागमन केलं आहे. इंदूरच्या मैदानावर खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात बुमराहने एक बळी घेत आपलं संघातलं महत्व सिद्ध केलं. श्रीलंकेचा कर्णधार आणि आयपीएलमध्ये बुमराहचा सहकारी लसिथ मलिंगानेही, जसप्रीतचं कौतुक केलं आहे.

“जसप्रीत बुमराह जगातला सर्वोत्त गोलंदाज आहे. त्याच्याकडे वेग आणि अचूक टप्प्यात मारा करण्याची क्षमता आहे. दुखापतीमधून सावरुन पुनरागमन करणं अनेकांना जमत नाही, त्यामुळे जसप्रीतची कामगिरी कशी होते हे पाहणंही महत्वाचं असेल”, पहिल्या सामन्यादरम्यान मलिंगाने आपलं मत मांडलं.

अवश्य वाचा – Video : जेव्हा विराट कोहली हरभजन सिंहच्या गोलंदाजीची नक्कल करतो…

दरम्यान, श्रीलंकेने विजयासाठी दिलेल्या १४३ धावांचा पाठलाग करताना भारताने चांगली सुरुवात केली. दोन्ही फलंदाजांनी पहिल्या विकेटसाठी ७१ धावांची भागीदारी केली. लोकेश राहुल माघारी परतल्यानंतर ठराविक अंतराने शिखर धवनही माघारी परतला. मात्र यानंत कर्णधार विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांनी फटकेबाजी करत भारताला विजयाच्या जवळ आणून ठेवलं. विजयासाठी ६ धावांची गरज असताना श्रेयस अय्यर माघारी परतला. यानंतर विराटने ऋषभ पंतच्या साथीने संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.