टी २० वर्ल्डकपमध्ये भारताने सलग दोन सामने गमवल्यानंतर अफगाणिस्तानविरुद्ध मोठा विजय मिळवला आहे. या विजयानंतर भारताच्या उपांत्य फेरीच्या आशेवर आहे. मात्र आता सर्वकाही इतर संघांच्या कामगिरीवर अवलंबून आहे. भारताला स्कॉटलँड आणि नामिबिया विरुद्धचा सामना जिंकवा लागेल. त्याचबरोबर अफगाणिस्तानने न्यूझीलंडला पराभूत करावं लागेल. जर तरची गणितं असताना आता भारताचा सलामीचा फलंदाज केएल राहुलने देशासाठी वर्ल्डकप जिंकायचा आहे, अशा भावना व्यक्त केल्या आहेत. आयसीसीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात केएल राहुल वर्ल्डकपबाबत बोलला आहे. "२०११ वर्ल्डकपच्या आठवणी समोर ठेवून लहानाचा मोठा झालो आहे. त्या विजयामुळे बऱ्याच गोष्टी माझ्यासाठी बदलल्या. त्या दिवसापासून मला आपल्या देशासाठी वर्ल्डकप जिंकायचं स्वप्न आहे. एक, दोन किंवा तीन वर्ल्डकप विजयी संघाचा मी भाग असायला हवं. देशासाठी इतिहास रचायचा आहे.", असं केएल राहुल या व्हिडिओत सांगताना दिसत आहे. आयसीसीने इन्स्टाग्रामवर २० सेंकदाचा व्हिडिओ शेअर केला आहे. पाकिस्तानने उपांत्य फेरी गाठली आहे. मात्र उपांत्य फेरीमध्ये जाणारा दुसरा संघ कोण यासाठी तीन संघांची दावेदारी कायम आहे. पण यामध्येही भारताला जर तरच्या आधारावर उपांत्य फेरी गाठता येणार आहे. म्हणजे सामन्याचे काही ठराविक निकाल लागले तर ग्रुप स्टेजमधील सर्व सामने संपल्यानंतर भारत, न्यूझीलंड, अफगाणिस्तानचे प्रत्येकी सहा गुण होण्याची शक्यता आहे. अफगाणिस्तानच्या संघाने चार सामने खेळले असून त्यांनी दोन सामने जिंकलेत दोन गमावले आहेत. त्यामुळेच त्यांचे एकूण चार गुण असून नेट रनरेट +१.४८१ इतका आहे. त्यांचे उर्वरित सामने हे न्यूझीलंड आणि स्कॉटलंडविरुद्धचा सामना बाकी आहे. यापैकी त्यांनी न्यूझीलंडच्या सामन्यात विजय मिळवल्यास भारताला फायदा होईल. कारण असं झाल्यास अफगाणिस्तानचेही सहा गुण होती आणि उरलेला एक सामना जिंकून न्यूझीलंडही सहा गुणांपर्यंतच मजल मारु शकेल. न्यूझीलंडने आतापर्यंत तीन सामने खेळले असून तीन पैकी त्यांनी दोन सामन्यांमध्ये विजय मिळवलाय. भारत आणि स्कॉलंडला त्यांनी पराभूत केलं आहे तर पाकिस्तानकडून त्यांचा पराभव झालाय. त्यांचा नेट रनरेट हा +०.८१६ इतका आहे. त्यामुळे तिसऱ्या स्थानी आहेत. अफगाणिस्तानविरुद्धचा सामना जिंकल्यास त्यांचं उपांत्य फेरीचं तिकीट निश्चित होणार आहे