पीटीआय, नवी दिल्ली : भारतीय ऑलिम्पिक संघटनेत (आयओए) निर्माण झालेला पेच सोडवण्यासाठी ‘आयओए’ आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या (आयओसी) पदाधिकाऱ्यांमधील बैठक यशस्वी झाली. त्यामुळे निवडणूकपूर्वी ‘आयओए’च्या घटनेत दुरुस्ती करणे शक्य होणार आहे.

डिसेंबर महिन्यापूर्वी निवडणूक घ्या अन्यथा बंदीला सामोरे जा, असा स्पष्ट इशारा ‘आयओसी’ने ‘आयओए’ला दिला होता. त्यानंतर ‘आयओए’च्या पदाधिकाऱ्यांनी संघर्ष मिटविण्यासाठी ‘आयओसी’च्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्याची मागणी केली होती. त्यानुसार ‘आयओए’ आणि ‘आयओसी’ पदाधिकाऱ्यांमध्ये मंगळवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस ‘आयओए’चे सरचिटणीस राजीव मेहता, उपाध्यक्ष आदिल सुमारीवाला आणि भारताचा पहिला वैयक्तिक ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नेमबाज अभिनव बिंद्रा उपस्थित होते.  ‘आयओए’वर सध्या प्रशासकीय समिती काम बघत असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कामकाज पाहण्याचे अधिकार सरचिटणीस राजीव मेहता यांना देण्यात आले आहेत. या बैठकीनंतर आता घटनेत बदल करून डिसेंबर महिन्यात निवडणूक घेण्याचा ‘आयओए’चा मार्ग मोकळा होऊ शकेल.

दहा वर्षांनंतर याच मुद्यावरील बैठकीसाठी बोलाविल्याचे मला आश्चर्य वाटले. प्रशासकीय चुकांची शिक्षा खेळाडूंनाही भोगावी लागते. त्यामुळे खेळाडूंना केंद्रस्थानी मानून ‘आयओए’च्या घटनेत बदल करण्याची, तसेच कारभारात पारदर्शकता आणण्याची मी सूचना कायम ठेवली आहे. 

– अभिनव बिंद्रा