१ जुलै ते ५ जुलै या काळात बर्मिंगहॅममधील एजबस्टन क्रिकेट स्टेडियमवरती भारत आणि इंग्लंड यांच्या दरम्यान निर्णायक कसोटी सामना खेळवला जात आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने झुंझार खेळी करत आपल्या कारकिर्दीतील पाचवे शतक झळकावले. सलामीच्या फलंदाजांनी इंग्लंडच्या गोलंदाजांसमोर माना टाकलेल्या असताना त्याने केवळ १११ चेंडूत १४६ धावा ठोकल्या. या खेळी दरम्यान त्याने मैदानात चौफेर फटकेबाजी केली. या दरम्यान त्याने अनेकदा काही विचित्र फटकेही मारले. त्याच्या अशाच एका फटक्याची सध्या चर्चा रंगली आहे.

भारतीय डावाच्या ५७व्या षटकामध्ये ऋषभ पंत इंग्लंडचा डावखुरा फिरकी गोलंदाज जॅक लीचचा सामना करत होता. एक चेंडू टोलावताना पंतचा तोल गेला आणि तो थेट जमिनीवर पडला. अशाही स्थितीत त्याने जोरदार चौकार मारत चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवला. असे करताना त्याच्या पायाला बॅटही लागली. त्याने केवळ ८९ चेंडूत शतक पूर्ण केले. हे भारतीय यष्टीरक्षकाचे कसोटीतील सर्वात जलद शतक ठरले.

भारतीय फलंदाजी ठेपाळली असताना पंत आणि जडेजाने सहाव्या गड्यासाठी २२२ धावांची भागीदारी केली आणि भारताला ३०० धावांचा टप्पा ओलांडून दिला. दोघांच्या संयमी खेळीमुळे भारताने पहिल्या दिवशी ७३ षटकांत सात गडी गमावून एकूण ३३८ धावा केल्या.