जाफरची पहिल्या डावातील ‘नवाबी’ शतकी खेळी आणि दुस-या डावातील गोलंदाजांच्या कामगिरीच्या बळावर मुंबईने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या सौराष्ट्रविरुद्धच्या अंतिम फेरीच्या सामन्यात ४० व्यांदा रणजी करंडकावर आपलं नाव कोरलं आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात मुंबईने सौराष्ट्रचा एक डाव आणि १२५ धावांनी धुव्वा उडवला आणि विक्रमी चाळीसाव्या विजेतेपदावर आपली मोहोर उमटवली.
अजित आगरकरच्या मुंबई संघाने दुस-या डावात २०७ धावांनी पिछाडीवर असलेल्या सौराष्ट्र संघाला अवघ्या ८२ धावांतच गारद केले. मुंबईसाठी धवल कुलकर्णीने पाच, अजित आगरकरनं चार तर अभिषेक नायरने एक बळी मिळवला. स्थानिक क्रिकेटमध्ये वर्षांनुवर्षे धावांचा पाऊस पाडणाऱ्या जाफरच्या खात्यावर रविवारी १०९व्या सामन्यात ३२वे शतक जमा झाले, पण ही खेळी जाफरसाठी खास होती. त्याने ८३ धावा करीत अमोल मुझुमदारचा रणजी क्रिकेट स्पध्रेतील सर्वाधिक धावांचा विक्रम मोडीत काढला. मुंबईने पहिल्या डावात सर्वबाद ३५५ धावांपर्यंत मजल मारली होती.
मुंबईच्या संघाने याआधी ४३वेळा अंतिम फेरी गाठली, यापैकी फक्त चार वेळा त्यांना विजेतेपद पटकावण्यात अपयश आले. ७५ वर्षांनंतर पहिल्यांदाच रणजी स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणा-या सौराष्ट्रच्या संघाने या प्रवासात अनेक दिग्गज संघांना धक्के दिले. मात्र, जेतेपदाच त्यांचं स्वप्न अधुरंच राहिलं.