घसघशीत पारितोषिक मिळणाऱ्या स्पर्धाऐवजी खेळाडूंनी राष्ट्रीय स्पर्धाना प्राधान्य द्यायला हवे, याबाबतच्या सूचना क्रीडा मंत्रालयाने भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई) आणि राष्ट्रीय क्रीडा महासंघाला (एनएसएफ) केल्या आहेत.
भारतातर्फे सहभागी होऊन पदके मिळवण्यापेक्षा बक्षिसाच्या रूपाने रोख रक्कम मिळवून देणाऱ्या स्पर्धामध्ये सहभागी होण्याकडे खेळाडूंचा कल वाढला आहे, याबाबत क्रीडा मंत्रालयाने साई आणि एनएसएफकडे विचारणा केली आहे. ‘‘सर्व प्रकारातील खेळाडू पदके मिळवून देणाऱ्या स्पर्धामध्ये देशाचे प्रतिनिधित्व करत नाहीत, असे आढळून आले आहे. भारतीय संघासाठी वैयक्तिक खेळाडूंची गरज भासल्यास, त्यांनी राष्ट्रीय सेवेला प्राधान्य द्यावे,’’ अशा आशयाचे पत्र क्रीडा मंत्रालयाकडून साईचे महासंचालक आणि सर्व राष्ट्रीय क्रीडा संघटनांचे अध्यक्ष तसेच सचिवांना पाठवण्यात आले आहे.
जर एखाद्या खेळाडूने राष्ट्रीय स्पर्धेत खेळण्यासाठी नकार दिला आणि त्यासाठी त्याने दिलेले कारण संशयास्पद वाटत असल्यास, त्या खेळाडूची राष्ट्रीय क्रीडा महासंघाकडून चौकशी केली जाईल. त्यावेळी त्या खेळाडूला सूट द्यायची की अन्य कारवाई करायची, याचा निर्णय त्या खेळाच्या राष्ट्रीय क्रीडा संघटनेला घ्यावा लागेल. क्रीडा मंत्रालयाच्या या सूचना सर्व खेळाडूंपर्यंत पोहोचवण्याचे आदेशही देण्यात
आले आहेत.