ऑलिम्पिक स्पर्धेत हमखास पदकांचे आशास्थान म्हणजे नेमबाजांचा चमू. खर्चीक खेळ असूनही गेल्या काही वर्षांत सरकारकडून मिळणारे निधीरूपी प्रोत्साहन, कॉर्पोरेट्सचा पुढाकार, क्रीडा स्वयंसेवी संस्थांचे साहाय्य या त्रिसूत्रीच्या बळावर भारतीय नेमबाजांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर दबदबा निर्माण केला आहे. २००४ मध्ये अथेन्स ऑलिम्पिक स्पर्धेत राज्यवर्धन सिंग राठोडने सुवर्णपदकाची कमाई केली. राज्यवर्धनच्या कामगिरीवर कळस चढवत अभिनव बिंद्राने २००८ बीजिंग ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदकावर कब्जा करीत इतिहास घडवला. ऑलिम्पिक स्पर्धेत वैैयक्तिक प्रकारात भारताला मिळालेले हे पहिलेच पदक. देशभरात नेमबाजासाठी पायाभूत सुविधांचा अभाव असताना, खेळाविषयी पुरेशी माहिती नसताना आणि देशात खेळ म्हणजे क्रिकेट असे वातावरण असताना अभिनवने मिळवलेले यश स्पृहणीय आहे. त्याच्या यशात अभिनवच्या घरच्यांची भूमिका निर्णायक आहे. अब्जावधी लोकसंख्या असतानाही भारताला हाताच्या बोटावर मोजण्याइतकी पदके का मिळतात अशा पोकळ चर्चामध्ये सहभागी न होता अभिनवने कृतीद्वारे प्रत्युत्तर दिले. अभिनवच्या यशाने देशभरातील नेमबाजी चळवळीला चालना मिळाली. त्याच्या यशातून प्रेरणा घेत नेमबाजीकडे वळलेली युवा पिढी रिओ ऑलिम्पिकमध्ये अभिनवच्या खांद्याला खांदा लावून देशाचे प्रतिनिधित्व करणार आहे. रिओ ऑलिम्पिकनंतर निवृत्त होणार असल्याचे अभिनवने स्पष्ट केले आहे. स्वत:च्या उदाहरणाने देशातल्या क्रीडा संस्कृतीला गती देणाऱ्या अभिनवला पदकासह खेळाला अलविदा करायला आवडेल. गेल्या वर्षभरातील त्याची सातत्यपूर्ण कामगिरी लक्षात घेता अभिनव ऑलिम्पिकसाठी तय्यार आहे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
अव्वल आंतरराष्ट्रीय नेमबाज सुमा शिरुर यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या मुंबईकर अयोनिका पॉलने रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र होण्याचा मान मिळवला. निष्णात जलतरणपटू असलेल्या अयोनिकाने नेमबाजीकडे यशस्वी मोर्चा वळवला. २०१४ ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत अयोनिकाने रौप्यपदकावर नाव कोरले होते. त्याच वर्षी स्लोव्हेनियात झालेल्या नेमबाजी विश्वचषकात तिने कांस्यपदक पटकावले होते. चार वर्षांपूर्वी ऑलिम्पिकसाठी पात्र होण्याची अयोनिकाची संधी थोडक्यात हुकली होती. यंदाच्या आशियाई नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदक मिळवत अयोनिकाने रिओवारी पक्की केली. या संधीचे सोने करण्यासाठी ती आतुर आहे.
व्यवसायाने दंतवैद्यक, मात्र पिस्तूल नेमबाजीत आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा झेंडा अभिमानाने फडकवणारी हीना सिधू लंडन ऑलिम्पिकचे अपयश पुसून टाकण्यासाठी प्रयत्नशील आहे. नेमबाजी विश्वचषकाच्या अंतिम फेरीमध्ये पिस्तूल प्रकारात सुवर्णपदकाची कमाई करणारी हीना पहिली भारतीय नेमबाज आहे. दिमाखदार प्रदर्शनासह हीनाने २०१४ मध्ये पिस्तूल नेमबाजीच्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी झेप घेतली होती. आंतरराष्ट्रीय नेमबाजी संघटनेतर्फे प्रकाशित होणाऱ्या वार्षिकांकावर झळकणारी हीना पहिली भारतीय नेमबाज ठरली होती. पिस्तूल नेमबाजीत जागतिक विक्रम नावावर असलेली हीना पती आणि नेमबाजपटू रौनक पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली खेळते आहे. वैयक्तिक आणि सांघिक अशा दोन्ही आघाडय़ांवर सराईतपणे खेळणाऱ्या हीनासमोर प्रदर्शनातील ध्रुवीकरण टाळण्याचे आव्हान असेल.
मित्रमैत्रिणी, धमालमस्ती, भटकंती असा सुखेनैव महाविद्यालयीन कालखंड बाजूला ठेवून जयपूरच्या अपूर्वी चंडेलाने नेमबाजीचा ध्यास जोपासला आहे. वरिष्ठ गटात संक्रमण झाल्यावर लगेचच अपूर्वीने राष्ट्रीय नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक नावावर केले. २०१४ मध्ये हाग येथे झालेल्या स्पर्धेत अपूर्वीने चार पदके पटकावली. याच वर्षी झालेल्या ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत अपूर्वीने सुवर्णपदकावर कब्जा केला. अभिनव बिंद्राच्या यशाने प्रेरित अपूर्वीने क्रीडा पत्रकारितेऐवजी खेळण्याचाच निर्णय घेतला. या निर्णयाने देशाला अव्वल नेमबाज मिळाली आहे. २३व्या वर्षी क्रीडाविश्वातल्या सर्वोच्च सोहळ्यात देशवासीयांना अभिमान वाटेल अशी कामगिरी करण्यासाठी अपूर्वी उत्सुक आहे.
लंडन ऑलिम्पिकमध्ये पदकप्राप्त आणि नेमबाजी विश्वचषकात सात पदके नावावर असणारा गगन नारंग रिओमध्येही पदकाचे आशास्थान आहे. खेलरत्न पुरस्काराने सन्मानित गगनची ही चौथी ऑलिम्पिकवारी असणार आहे. मूळचा नेपाळचा, मात्र आता पक्का भारतीय झालेल्या जितू रायने अवघ्या दोन वर्षांत पिस्तूल नेमबाजीत आंतरराष्ट्रीय स्तरावर दिमाखदार प्रदर्शनाने दबदबा निर्माण केला आहे. नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत एक, नेमबाजी विश्वचषकात चार, राष्ट्रकुल स्पर्धेत एक आणि आशियाई स्पर्धेत दोन अशा घाऊक प्रमाणावर जितूने पदकांची लयलूट केली आहे. वडिलांच्या निधनानंतर जितूने भारतात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. भारतीय लष्कराच्या सेवेत असतानाच नेमबाजीसारख्या अवघड खेळाची वाट चोखाळली. सुरुवातीच्या अपयशाने खचून न जाता जितूने केलेली वाटचाल अचंबित करणारी आहे. रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र होणारा जितू पहिला भारतीय नेमबाज आहे. ऑलिम्पिकची नवलाई बाजूला सारत लौकिकाला साजेसा खेळ करण्यासाठी जितू आतुर आहे. भारतीय लष्करात कार्यरत चैन सिंग आणि गुरप्रीत सिंगही रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. प्रसिद्धीपासून दूर आणि आपल्या खेळाशी सचोटी जपणारे हे दोन वीर ऑलिम्पिकमध्ये काय कमाल करतात याकडे साऱ्यांचे लक्ष आहे. ट्रॅप प्रकारात वाकबगार मानवजीत सिंग संधू रिओद्वारे चौथी ऑलिम्पिकवारी करणार आहे. ट्रॅप प्रकारात आंतरराष्ट्रीय स्तरावर असंख्य पदके नावावर असणाऱ्या मानवजीतला खेलरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. मानवजीतच्या जोडाला क्यान चेनाई ऑलिम्पिक पदार्पण करणार आहे. स्कीट या दुर्लक्षित प्रकारात मैराज अहमद खान या अनुभवी नेमबाजाकडून भारतीयांना अपेक्षा आहेत. घरातूनच नेमबाजीचे बाळकडू मिळालेल्या प्रकाश नानजप्पाची मोटारस्पोर्ट्स पहिली आवड होती. व्यवसायाने सॉफ्टवेअर अभियंता असणाऱ्याने प्रकाशने उशिराने नेमबाजीला सुरुवात केली. अल्प कालावधीत आंतरराष्ट्रीय पटलावर आपल्या नावाची मोहर उमटवणाऱ्या नेमबाजांमध्ये प्रकाशचा समावेश होतो.
भारतीय नेमबाजांनी पटकावलेली ऑलिम्पिक पदके
- २००४ (अथेन्स) – राज्यवर्धन सिंग राठोड : रौप्यपदक : डबल ट्रॅप
- २००८ (बीजिंग) – अभिनव बिंद्रा : सुवर्णपदक : १० मीटर एअर रायफल
- २०१२ (लंडन) – विजय कुमार : रौप्यपदक : २५ रॅपिड फायर पिस्तूल
- २०१२ (लंडन) – गगन नारंग : कांस्य : १० मीटर एअर रायफल
भारतीय नेमबाजी संघ
- अभिनव बिंद्रा (१० मीटर एअर रायफल)
- क्यान चेनाई (ट्रॅप)
- मेराज अहमद खान (स्कीट)
- प्रकाश नानजप्पा (५० मी. पिस्तूल)
- गगन नारंग (१० मीटर एअर रायफल, ५० मीटर रायफल प्रोन, ५० मीटर रायफल थ्री पोझिशन)
- जितू राय (१० मीटर एअर पिस्तूल, ५० मीटर पिस्तूल)
- चैन सिंग (५० मीटर रायफल प्रोन, ५० मीटर रायफल थ्री पोझिशन)
- गुरप्रीत सिंग (१० मीटर एअर पिस्तूल, २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूल)
- मानवजीत सिंग संधू (ट्रॅप)
- अपूर्वी चंडेला (१० मीटर एअर रायफल)
- अयोनिका पॉल (१० मीटर एअर रायफल)
- हीना सिधू (१० मीटर एअर पिस्तूल, २५ मीटर पिस्तूल)
पराग फाटक
parag.phatak@expressindia.com