नीलेश कुलकर्णी आम्ही वयाच्या १२-१३ व्या वर्षी भंडारी करंडक क्रिकेट स्पर्धेत एकमेकांविरुद्ध खेळलो. या शालेय क्रिकेट स्पर्धेत मी एस. व्ही. जोशी शाळेकडून खेळायचो, तर सचिन व विनोद कांबळी शारदाश्रमकडून खेळत होते. त्या सामन्यात शारदाश्रम संघाने आम्हाला मोठय़ा फरकाने पराभूत केले. त्यानंतर मुंबईच्या १५ वर्षांखालील संघाकडून मी खेळलो, तेव्हा सचिन संघाचा कर्णधार होता. त्यावेळी आम्ही अहमदाबादला गेलो. तो खऱ्या अर्थाने सचिनसोबत माझा परिचय. यानंतर सचिन जेव्हा भारतीय संघाचा कर्णधार झाला, तेव्हा त्याच्या नेतृत्वाखाली मला कसोटी पदार्पण करण्याची संधी मिळाली. कसोटी सामन्याआधी मी सचिनसोबत एकदिवसीय सामना खेळलो होतो. दडपण कसे हाताळायचे आणि सर्वोत्तम कामगिरी कशी करायची याची कल्पना मला सचिनने दिली होती. त्यामुळे कसोटी पदार्पण करताना माझा आत्मविश्वास दुणावला होता. माझे पदार्पण संस्मरणीय झाले. सचिनने विश्वासाने माझ्याकडे चेंडू सोपवला आणि मी त्याचा निर्णय सार्थकी लावताना पहिल्याच चेंडूवर बळी मिळवला. सचिनला कायमच मित्र व कुटुंबीय यांच्याबद्दल आपुलकी होती. सचिन नेहमी सर्वासाठी वेळ काढतो, हे त्याचे वैशिष्टय़ म्हणावे लागेल. मी त्याला १५ वर्षांखालील क्रिकेट संघापासून बघतो आहे. त्याने तुम्हाला भेटण्याचे कबूल केले, तर तो तुमच्यासाठी वेळ काढणार हे नक्की. हेच त्याचे मोठेपण आहे. आजही तो व्यस्त कार्यक्रमातून त्याच्या मित्रांना आणि इतर लोकांना वेळ देतो. सचिन तेंडुलकर हे भारतीय क्रिकेटमधील खूप मोठे नाव आहे. सचिन ही एक संस्था आहे. क्रिकेट खेळताना आणि आता निवृत्तीनंतरही त्याच्याकडे जे कौशल्य आहे, ते फार कमी लोकांकडे असते. तो अनेकांना चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करतो, जी कौतुकास्पद बाब आहे. क्रिकेटपटू म्हणून सचिन मोठा होताच, पण माणूस म्हणूनही तो तितकाच मोठा आहे. त्याने आजवर लोकांना खूप काही दिले आहे आणि यापुढेही इतरांची अशीच मदत करत राहील अशी अपेक्षा त्याच्या वाढदिवसानिमित्त व्यक्त करतो. (लेखक सचिनचे सहकारी आणि माजी कसोटीपटू आहेत.)