हैदराबादहून बंगळुरूकडे जाणाऱ्या महामार्गावर मोइनाबाद शहराच्या आधी एक रस्ता डावीकडे जातो. वाहनांची वर्दळ एकदम कमी होते. एका वेळी जेमतेम दोन मोठी वाहनं जातील असा रस्ता सुरू होतो. पावसामुळे हिरवीकंच झालेली सृष्टी डोळ्यांना सुखावते. कुठलंच प्रदूषण नसल्यानं प्रत्येक श्वास रंध्रारंध्रात साठवून ठेवावासा वाटतो. आपण पत्ता चुकलोय असं वाटायला लागतं. निवांत म्हशींचा एक ताफा आपल्याला न्याहाळतो. तेवढय़ात उजव्या दिशेनं जाणारा छोटा रस्ता जाताना दिसतो. तिथेच एक साधासा फलक रोवलेला दिसतो. पांढऱ्या पृष्ठभागावर हिरव्या रंगात लिहिलेलं असतं- ‘सानिया मिर्झा टेनिस अकादमी’. रस्ता आणखी लहान होतो. एका बाजूला चाफ्याची झाडं तर दुसऱ्या बाजूला गवताची पाती वाऱ्यावर डोलत असतात. हिरवीगार वळणं घेत रस्ता जाऊन थबकतो. गेटमधून आत शिरून पुढे गेल्यावर टुमदार फार्महाऊसप्रमाणे वास्तू दिसते. पांढऱ्या रंगाच्या दुमजली वास्तूवर कोणाचंही नाव नव्हतं. जरा मागे डोकावलं तर अचंबित करणारं दृश्य. वनभोजनाला जावं अशा वातावरणात आंतरराष्ट्रीय दर्जाची नऊ हार्ड कोर्ट्स आणि तीन क्ले कोर्ट्स पावसाच्या सरीनंतरच्या उन्हात चमकत असतात. सहा ग्रॅण्डस्लॅम जेतेपदे आणि दुहेरीच्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या सानिया मिर्झाच्या संकल्पनेतून साकारलेली ही संरचना. सानियाची आई नसीमा मिर्झा स्वागत करतात. अकादमीचे फोटो काढा, पण माझा फोटो नको असं ठामपणे सांगतात. सानियाकडे असलेला आत्मविश्वास आणि रोखठोक स्वभाव कुठून आला याची तात्काळ प्रचीती येते. अकादमीत सरावासाठी आलेल्या लहान मुलांशी गुजगोष्टी करत नसीमा माहिती देऊ लागतात.
‘‘सानियाला ज्या कष्टांचा सामना करावा लागला होता, तो नव्या पिढीला भोगायला नको, यासाठीच हा सगळा खटाटोप. शेणापासून तयार करण्यात आलेल्या कोर्टवर सानिया खेळली आहे. अनेकदा कोर्टवर खड्डे असत. ज्यामुळे तिच्या पायाच्या घोटय़ाला दुखापत झाली आहे. अकादमीची संकल्पना आमची आहे. महेश भूपतीच्या कंपनीने कोर्टाची निर्मिती केली आहे. फ्रेंच खुल्या स्पर्धेच्या धर्तीवर विटांचे सहा थर देऊन क्ले कोर्ट तयार केलं आहे. ग्रास कोर्ट केव्हाही तयार करता येऊ शकतं,’’ असं नसीमा यांनी सांगितलं.
अकादमीचा विचार कधी डोक्यात आला, या प्रश्नाचं उत्तर देताना नसीमा म्हणाल्या, ‘‘२००३ मध्ये सानियाने विम्बल्डन जेतेपदावर कब्जा केला. त्या वेळी अकादमीचा विचार डोक्यात आला. जमीन आधीच खरेदी केली होती, पण पडीक होती. सानियानं यशोशिखर गाठलं, मग आम्ही अकादमीविषयी गांभीर्यानं विचार सुरू केला. अकादमीचं बांधकाम पूर्ण व्हायला साडेतीन वर्षे लागली. आम्ही कोणाकडूनही पैसा घेतला नाही. त्यामुळे वेळ लागला. या प्रकल्पासाठी ७-८ कोटी रुपये खर्च आला.’’
‘‘आम्ही जमीन घेतली, तेव्हा इथे काहीच नव्हतं. चार वर्षांत या परिसराचा कायापालट होईल. खेळताना शांतता असावी, कोणत्याही स्वरूपाचे प्रदूषण असू नये. सहजतेने एकाग्र व्हावे, या विचारातून शहरापासून दूर जागा निवडली. सध्या अकादमीत ७० ते ८० मुलं टेनिसची धुळाक्षरं गिरवत आहेत. त्यांना शिकवण्यासाठी १० प्रशिक्षकांची फौज आहे,’’ असं नसीमा यांनी सांगितलं.
‘‘सानियानं टेनिसच्या निमित्ताने देशांतर्गत प्रचंड प्रवास केलाय. आमच्याकडेही पैसा नव्हता. हमारी ख्वाहिशों को मारके इसको बनाया. त्याग करावा लागतो. फिरायला गेलो नाही. तिची कारकीर्द हेच आमचं आयुष्य झालं. देशभरात टेनिसचा प्रसार करण्यात सानियाचा वाटा मोलाचा आहे. मुली आहेत म्हणून नाराज झालो नाही. त्यांना आवडलं त्या क्षेत्रात जाऊ दिलं. सातत्याने चांगली कामगिरी करते आहे म्हणूनच यश मिळालं आहे. प्रसारमाध्यमं वाद निर्माण करतात. तेच संपवतात. नायक किंवा खलनायक करायचं तेच ठरवतात,’’ असं नसीमा यांनी आपलं प्रामाणिक मत प्रकट केलं.
त्या पुढे म्हणाल्या, ‘‘सानियानं कधीही वादांची पर्वा केली नाही. आपण करतोय ते योग्य आहे, याची तिला जाणीव आहे. ती जे करतेय ते योग्य असेल याची आम्हाला खात्री आहे. बाकी कशानं फरक पडत नाही. ती बोलते ते करून दाखवते. पालक, मुलं आणि प्रशिक्षक अशी त्रिसूत्री आहे. पालकांच्या बरोबर मुलं सर्वाधिक वेळ असतात. त्यामुळे पालकांना योजनेत सहभागी करून घेणं अत्यावश्यक आहे. एकत्रित आलो तरच योग्य दिशेने जाऊ शकतो. कोणताही बदल असेल तर पालकांना माहिती हवं. आताचे पालक अतिउत्साही आहेत. प्रक्रियेला महत्त्व देत नाहीत. अथक मेहनत करावीच लागते. मुलांवर दडपण आणतात. त्याने स्वारस्य संपते. त्यांनी खेळाचा आनंद लुटायला हवा. २४ वर्षांत सानियाने एकदाही आज सराव नको असं म्हटलेलं नाही. असा दृष्टिकोन हवा!’’
‘‘प्रार्थना ठोंबरे चांगली खेळते, हे सानियाच्या लक्षात आलं. आता सानिया तिच्यासह खेळते आणि शिकवतेही. अकादमीत आल्यानंतर प्रार्थनाने १६ पैकी १२ स्पर्धाची जेतेपदे पटकावली आहेत. जागतिक क्रमवारीत साडेतीनशेहून १८६ पर्यंत आगेकूच केली आहे. ऑलिम्पिकमध्ये सानिया आणि प्रार्थना भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत,’’ असं नसीमा मिर्झा यांनी सांगितलं.
पराग फाटक
parag.phatak@expressindia.com