कोहलीला एकदिवसीय कर्णधारपदावरून हटवल्याप्रकरणी चाहत्यांच्या टीकेनंतर ‘बीसीसीआय’ला उपरती

भारतीय क्रिकेटसाठी गेल्या २४ तासांचा काळ नाट्यमय घडामोडींचा ठरला. जवळपास पाच वर्षे नेतृत्वपद सांभाळणाऱ्या विराट कोहलीची इच्छा नसतानाही एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरून हकालपट्टी करण्यात आली, याची कारणमीमांसाही न करण्यात आल्याने चाहत्यांनी दिवसभर ‘बीसीसीआय’वर ताशेरे ओढले. कोहलीप्रेमींचा वाढता रोष पाहून ‘बीसीसीआय’ने सायंकाळी भूमिकेचे स्पष्टीकरण दिल आणि त्याच्या कर्णधारपदाच्या कारकीर्दीची प्रशंसा केली. अध्यक्ष सौरव गांगुलीने मर्यादित षटकांसाठी दोन कर्णधार नकोत, हे निवड समितीचे धोरण असल्याचे मांडले. मात्र या सर्व घटनांमुळे भारतीय संघात सगळे काही आलबेल नसल्याचे स्पष्टपणे जाणवले.

’  कोहलीची एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरून हकालपट्टी केल्यानंतर चाहत्यांनी ‘बीसीसीआय’वर तोफ डागली. अखेर एका दिवसाच्या विश्रांतीने का होईना, ‘बीसीसीआय’ने गुरुवारी कोहलीचे आभार मानले. कोहलीबाबतच्या निर्णयानंतर समाजमाध्यमांवर ‘बीसीसीआय’ला लक्ष्य करण्यात  आले. कोहलीच्या कौतुकाचा एकही संदेश अथवा पोस्ट संघटनेने टाकली नाही. पण टीकेनंतर ‘बीसीसीआय’ला उपरती आली. २०१७मध्ये त्याने तिन्ही प्रकारांतील कर्णधारपद स्वीकारल्यावर कारकीर्दीतील पहिल्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडविरुद्ध साकारलेल्या शतकाची चित्रफीत ‘ट्विटर’वर टाकून ‘बीसीसीआय’ने चाहत्यांची मने  जिंकण्याचा प्रयत्न केला.

दिशादर्शक म्हणून कोहलीची संघाला गरज -रोहित

कोहली आता एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० संघाचा कर्णधार नसला, तरी युवा खेळाडूंना दिशा दाखवण्यासाठी तसेच फलंदाज म्हणून संघाला अद्यापही त्याची गरज आहे, असे मत भारताचा नवा कर्णधार रोहित शर्माने व्यक्त केले. ‘‘संघातील सर्व खेळाडूंना त्यांची भूमिका स्पष्ट केल्यास कर्णधाराला फक्त २० टक्केच कार्य करायचे असते. कोहलीने कर्णधार म्हणून त्याचे महत्त्व सिद्ध केले आहे. आता तो मर्यादित षटकांच्या प्रकारात कर्णधार नसला तरी संघाला फलंदाज म्हणून त्याची खरंच गरज आहे. त्याशिवाय दडपणाच्या स्थितीत माझ्यासह अन्य खेळाडूंना मार्गदर्शन करण्यासाठी पुढारी म्हणून कोहली हवा आहे’’ असे रोहित यू-ट्यूबवरील एका मुलाखतीदरम्यान म्हणाला.

‘बीसीसीआय’ आणि निवड समितीमध्ये मर्यादित षटकांच्या प्रकारातील कर्णधारपदावरून सुस्पष्टता होती. ट्वेन्टी-२० विश्वचषकातील मानहानीनंतर ‘आयसीसी’ स्पर्धांमधील भारताची कामगिरी चर्चेचा विषय ठरला. अशा स्थितीत निवडकर्त्यांना रोहितमध्ये अधिक विश्वास जाणवला. त्यामुळे कोहलीची हकालपट्टी निश्चित होती. राहुल द्रविड २०२३पर्यंत भारताचे मुख्य प्रशिक्षकपद सांभाळणार असल्याने त्याला आणि रोहितला ट्वेन्टी-२० तसेच एकदिवसीय विश्वचषकासाठी संघबांधणी करणे सोपे जाईल. 

-‘बीसीसीआय’चा पदाधिकारी