प्राजक्ता माळी

अकरावी आणि बारावी मी पुण्यातील एस. पी. कॉलेजमधून केले. नृत्याची आवड होतीच. मग पदवी शिक्षण पूर्ण करण्यासाठी पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रात प्रवेश घेतला. तिथून मी ‘परफॉर्मिंग आर्ट्स’ भरतनाटय़ममधून बी. ए. आणि एम. ए. केले. त्यादरम्यान मला भारत सरकारची शिष्यवृत्तीही मिळाली. ललित कला केंद्रामुळे माझ्या आयुष्याला कलाटणी मिळाली. ‘परफॉर्मिंग आर्ट्स’मध्ये नर्तन, गाणे, नाटकच होते. त्यामुळे व्याख्याने, लिखापढी, मोठा ग्रुप असे काही नव्हतेच. सगळेच कलाकार असल्यामुळे ठार वेडे होते. त्यामुळे कॉलेजच्या काळात असे फार काही किस्से घडले नाहीत. मला आठवतेय, आमची ७० ते ८० व्याख्याने ही झाडाखाली, अंगणात, थिएटरमध्ये आणि गाण्याच्या वर्गात झाली. ते आमच्यासाठी खूपच ‘युनिक’ होते.

परफॉर्मिग आर्ट्सचे कॉलेज असल्यामुळे सतत कलेसंबंधित उपक्रम व्हायचे. सतत काहीतरी असायचेच. दुसऱ्या वर्षांला आम्हाला नाटक हा विषय अनिवार्य होता. त्यात दोन पर्याय होते नाटक वा संगीत. तेव्हा मी नाटक निवडले होते. ‘संहिता ते प्रयोग’ हा आमच्या अभ्यासक्रमातील एक भाग होता. एखादी कथा लिहून, त्याचे दिग्दर्शन करून, प्रकाशयोजना, वेशभूषा या सर्वाची अंमलबजावणी करण्यापर्यंतची सर्व प्रक्रिया प्रत्येक विद्यार्थ्यांने करावयाची. या ‘संहिता ते प्रयोग’ या संकल्पनेत माझाही सहभाग होता. त्यातील अनुभवांनी मला खूप समृद्ध केले.

एकंदरच कॉलेजचे वातावरण इतर कॉलेजपेक्षा वेगळे असल्याने आमच्या कॉलेजमध्ये कट्टय़ावर बसून टिंगलटवाळ्या करणे हा प्रकारच नव्हता. आमच्या सर्वसाधारण गप्पा कधी व्हायच्याच नाहीत. सगळ्या गप्पा एकदम उच्च पातळीवरच्या, कलेसंबंधित, नाटक, पुस्तके, कथा, कादंबरी यांच्यावर व्हायच्या. प्रत्येक व्यक्ती वेगळी होती. कोणीच एका ठरावीक साच्यात नव्हते. विविधता होती, तरी त्यात गंमतही होती. आम्ही परफॉर्मिंग आर्टस् शिकत होतो, मुळात या संकल्पनेतच गंमत आहे. इतरांपेक्षा निश्चितच आम्ही वेगळे होतो. कॉलेजची एक मजा आम्ही लुटली ती म्हणजे आम्ही बऱ्याचदा कॅन्टीनमध्ये पडीक असायचो. तिथे चहा एक नंबर मिळायचा आणि मुळात कलाकार आणि चहा यांचे फार घनिष्ठ नाते आहे. तेव्हा पिझ्झा, बर्गर या गोष्टी नव्यानेच नावारूपास येऊ  लागल्या होत्या. त्यामुळे तेव्हा आम्ही पिझ्झाची खवय्येगिरी जरा जास्तच केली. आम्हाला तेव्हा असे वाटायचे, काहीतरी खूप भारी खातोय आपण.

मला ललित कला केंद्रातील पहिला दिवस अतिशय स्पष्ट आठवतोय. सतीश आळेकर सरांनी पहिल्या दिवशी सांगितलेले प्रत्येक वाक्य आठवतेय. ते आमच्या विभागाचे प्रमुख होते. ते म्हणाले होते, की भरपूर नाटकं बघा. भरपूर चित्रपट बघा. सगळ्या कार्यक्रमांना उपस्थित राहा, खूप वाचन करा, निरीक्षण करा. सतत तुमचे डोळे उघडे ठेवा आणि हे सर्व मजा म्हणून करू नका, तर त्याकडे तुमचा अभ्यासक्रम म्हणून बघा आणि या वाक्याने माझा सर्व दृष्टिकोनच बदलला.

ललित कला केंद्रातील शेवटचा दिवस माझ्या आयुष्यात आलाच नाही. कारण ललित कला केंद्रातून मला कधीच उत्तीर्ण होऊन बाहेर पडायचेच नव्हते. देवाने माझी ही इच्छा इतकी मनापासून ऐकली, की त्याने माझे शिक्षण अर्धवट ठेवले. कारण दरम्यानच्या काळात मी मालिकेच्या चित्रीकरणासाठी मुंबईला आले. त्यामुळे व्याख्यानांना उपस्थित राहणे मला अशक्य झाले. माझा असा कयास होता मी की निदान परीक्षेसाठी तरी येईन. पण असे काहीच घडले नाही. मला शूटिंगमधून सुट्टी मिळाली नाही. खरं सांगायचे तर हे माझ्या पथ्यावर पडले. मी एम. ए. केले. माझे शेवटचे सेमिस्टर फक्त राहिले आहे. परंतु मी अलंकार केले असल्यामुळे ते एम. ए.च्या पातळीवरचे आहे. माझ्याकडे एम. ए.चे प्रमाणपत्र नसले तरी अलंकार झाले असल्यामुळे मी एम.ए. झाल्याचे सांगते. मला उत्तीर्ण व्हायची इच्छाच नव्हती, पण तरीही मी जर उत्तीर्ण झालेच तर त्वरित याच कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून रुजू होईन आणि पुढे जाऊन मी ललित कला केंद्राची प्रमुख होईन. नृत्यात पीएचडी करेन, हे असे सर्व प्लॅन माझे तयार होते. परंतु सुदैवाने मी अभिनय क्षेत्रात आले. आता नृत्य, ललित कलाकेंद्र माझ्यापासून खूपच लांब गेले. तरीही आयुष्यात पीएचडी नक्की करेन.

मी खूपच विसरभोळी होते. आमची एक परीक्षा होती, खूपच अवघड परीक्षा असल्याने दोन दिवस घरी बसून तयारी केली होती. साडी, नेलपेंट, गंध, काजळ अशा छोटय़ा छोटय़ा गोष्टी मी आठवणीने बॅगमध्ये भरल्या आणि तिथे गेल्यानंतर माझ्या लक्षात आले, की मी घुंगरूच आणले नाहीत. जी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, एखाद्या नर्तकीसाठी, परीक्षेसाठी. नेमकी तीच गोष्ट मी नेली नव्हती. तेव्हा मी गुरूंचा भरपूर ओरडा खाल्ला. त्याच्या नंतरच्या सेमिस्टरला पुन्हा तेच गुरू होते. आमच्या अभ्यासात एक वाद्य असते, जे नर्तिकांना येणे अपेक्षित असते. त्याला तट्टकळी म्हणतात. गेल्या परीक्षेला खूपच ओरडा खाल्ल्यामळे आता अजिबात माती खायची नाही, म्हणून मी परत तशीच भरपूर तयारी केली आणि यावेळी मी नेमकी तट्टकळी विसरले. त्यामुळे पुन्हा मला ओरडा बसला.   एकंदरच ललित कला केंद्राने माझे आयुष्य पूर्णपणे पालटवले. नाही तर पूर्वी नाकासमोर चालणारी मुलगी होते. माझ्यातले जे काही ‘सुप्त’ गुण होते ते ललित केंद्रामुळेच बाहेर आलेत.

शब्दांकन : मितेश जोशी