|| वैद्य विजय कुलकर्णी, आयुर्वेद चिकित्सक

हिवाळ्यातील थंडी दम्याच्या रुग्णांना त्रासदायक ठरू शकते. अनेक जणांना थंडी जवळ आली की अस्वस्थता वाटू लागते. दम्याची कारणे, लक्षणे, उपचार यासंबंधी सविस्तर ऊहापोह आयुर्वेदाने केलेला आहे. या विकाराचे आयुर्वेदाने श्वास असे नामकरण केले आहे. याचे परत एकूण पाच प्रकार पडतात. त्यामध्ये तमक श्वास हा प्रकार व्यवहारात नेहमी आढळतो. याला आधुनिक परिभाषेत अस्थमा असे म्हटलेले आहे.

तमक श्वासामध्ये दम्याचा झटका (अटॅक) येतो. यामध्ये श्वास घेण्याला अतिशय त्रास होतो. जीव घाबरा होतो. डोळ्यापुढे अंधारी आल्यासारखी वाटते. खोकल्याची उबळ येते, कफ नीट सुटत नाही. तो पडून गेल्यावर मात्र बरे वाटते.

दम्याची कारणे : आयुर्वेदाने वात आणि कफ या दोन शरीर घटकांमधील असमतोल हे दम्याचे कारण सांगितले आहे. हा असमतोल निर्माण होण्याला अनेक कारणे घडतात. धूळ, धूर यांची शरीराशी असलेली असात्म्यता (अलर्जी) अतिशय आंबट पदार्थ नेहमी खाणे (उदा. दही), अतिशय थंड पदार्थाचे सेवन अति प्रमाणात व नेहमी करणे, कफवर्धक घटकांचा खाण्यात अति उपयोग करणे. यामुळे दम्याचा त्रास उद्भवू शकतो. आनुवंशिकता हीदेखील दम्याला कारणीभूत ठरते. म्हणून ज्यांच्या कुटुंबात दम्याचा इतिहास आहे, त्यांनी आपल्या मुलांच्या आहार-विहारावर लहानपणापासूनच योग्य नियंत्रण ठेवायला हवे. हल्ली लहान मुलांमध्ये आइसक्रीम, शीतपेये आदींच्या सेवनाचे प्रमाण वाढत चाललेले दिसते आहे. दम्याचा त्रास असणाऱ्या पालकांच्या मुलांनी (वरील पदार्थाचे) अतिसेवन करणे हे धोकादायक ठरू शकते. दम्याच्या रुग्णामध्ये फुप्फुसातील श्वासनलिकांचे स्नायू आंकुचन पावतात. त्यामुळे शरीराला आवश्यक तेवढा प्राणवायू मिळत नाही आणि श्वासोच्छ्वासाला अडथळा निर्माण होतो. फुप्फुसामध्ये जास्त प्रमाणात कफाचा संचय झाल्यासही त्रास होऊ  शकतो.

दम्याचा वेग आल्यास कोमट केलेले तिळाचे तेल आणि त्यामध्ये थोडेसे सैंधव टाकून ते छातीला चोळून थोडा शेक घेतल्यास कफ पातळ होऊन बरे वाटते. अर्थात हा उपायही वैद्यकीय मार्गदर्शनाखाली करणेच योग्य. प्राणायाम योग्य व शास्त्रीय पद्धतीने करणे हादेखील दम्याच्या उपचारांमधील महत्त्वाचा भाग आहे.

आयुर्वेदाने जी पंचकर्मे सांगितली आहेत. त्यामधील वमन हे कर्म दम्याच्या रुग्णांमध्ये महत्त्वाचे व उपयुक्त ठरू शकते. कफसंचय होण्याची शारीरिक प्रवृत्ती या विधीवाटे कमी होते. कारण या विधीद्वारे उलटीवाटे कफ शरीराबाहेर टाकला जातो. कफाच्या निर्मितीवरही याचा परिणाम होतो. या विधीप्रमाणे काही रुग्णांमध्ये विरेचन या विधीचाही उपयोग होतो. अर्थात हेदेखील वैद्याच्या सल्ल्यानेच करावयाचे असते.

उपचारांची दिशा

कफ आणि वात या दोषांमध्ये समतोल निर्माण करणे हा या उपचारांचा प्रमुख भाग असतो. अतिसंचित कफामुळे निर्माण होणाऱ्या दम्यामध्ये कफ हा घटक कमी प्रमाणात निर्माण होईल, अशी उपचार पद्धती घेणे गरजेचे आहे. कफ जास्त प्रमाणात होण्याची प्रवृत्ती एकदा कमी झाली की, मग दम्याची तीव्रता कमी होते. दम्याच्या रुग्णांनी केळी, गार दूध, मासे, दही, थंड पाणी यांचे सेवन टाळणे हाही उपचारांतील मुख्य भाग आहे. अर्धा चमचा आल्याचा रस आणि एक चमचा मध हे मिश्रण सकाळच्या वेळात घेणे, इतर काही कफनाशक द्रव्यांचा वापर करणे, गरम पाण्याचे सेवन करणे आदी आयुर्वेदीय पद्धतीचे उपचार (वैद्याच्या मार्गदर्शनाखाली) केल्यास या विकारात फायदा होऊ  शकतो.

ayurvijay7@gmail.com