डॉ. अरुणा टिळक arunatilak@gmail.com विविध व्यावसाय करणाऱ्या व्यक्तींनी ते करत असलेल्या कामानुसार आहार करावा लागतो. आहाराचे नियोजनही व्यावसायाशी संबंधित असते. या सदरात आता आपण विविध क्षेत्रांतील व्यक्तींना कसा आहार घ्यावा, हे बघणार आहोत. आमच्या लहानपणी, आमच्या बाजूला एक स्वयंपाकी राहायचे. ते दररोज फक्त जिलेब्या तळणे, बुंदीचे लाडू करणे अशी पक्वान्नेच तयार करत. त्यांना मी नेहमी ताक पितानाच बघत असे. ते तांब्या तांब्या फक्त ताकच घेत असत. त्या ताक पिण्याचा संदर्भ त्यांच्या व्यवसायाशी होता हे नंतर माझ्या लक्षात आले. शेफ, कुक, आचारी, बेकरीमध्ये भट्टीजवळ काम करणारे, बेकरीत सतत ओव्हनजवळ काम करणारे, चहाच्या टपरीवर काम करणारे, ज्या ठिकाणी रोज शेकडो किलो अन्न शिजवले जाते, अशा ठिकाणी काम करणारे, रोज पाचशे-हजार पोळ्या करणाऱ्या महिला यांनी काय आहार घ्यावा हे लक्षात घेतले पाहिजे. या सर्व व्यक्तींचा अग्नीशी सतत संपर्क येतो. यातील उष्म्याच्या त्रासाने त्यांची त्वचा, डोके आणि डोळे या अवयवांवर परिणाम होत असतो. त्यांना पचनसंस्थेचे विकार होतात. नपुंसकत्व, मानसिक विकार होऊ शकतो. पचनसंस्थेच्या विकारात पित्ताचा त्रास, अल्सर, भूक मंदावणे, त्वचेवर तोंड येणे, अपचन, बद्धकोष्ठ, सतत मळमळ होणे, मलामध्ये रक्तस्राव होणे, मूळव्याध होणे हे त्रास होऊ शकतात. सतत डोके दुखणे, अर्धशिशी, उष्णतेमुळे अंगदुखी, कायम थकवा येणे, शरीरातील पाण्याचा जलांश कमी झाल्याने वजन घटणे, असे आजार त्यांना होऊ शकतात. शरीराचा आणि मनाचा अतूट संबंध असतो. त्यामुळे मनावरसुद्धा परिणाम होताना दिसतो. चिडचिडेपणा वाढणे. शीघ्रकोपी, संतापी स्वभाव होणे, कुठलीही गोष्ट सहन न होणे असे मानसिक विकार होतात. सतत उष्णतेच्या संपर्काने शुक्राणुनाश होऊन वंध्यत्वसुद्धा येऊ शकते. उष्णतेमुळे होणारे आजार टाळण्यासाठी त्यावर क्षीतोपचार करणे. थंड गोष्टींच्या संपर्कात राहणे (एसी नव्हे) गरजेचे असते. पण हे सर्व उपाय करताना महत्त्वाची खबरदारी घ्यावी लागते म्हणजे उष्णतेच्या संपर्कातून दूर झाल्यावर लगेचच हे उपाय करू नयेत. नाहीतर गरम काचेवर पाण्याचे थेंब जरी पडले तरी ती तडकावयास वेळ लागत नाही, हे लक्षात ठेवावे. पित्त वाढू नये यासाठी जेवणामध्ये धन्याचा, जिऱ्याचा, कोथिंबीरीचा भरपूर प्रमाणात वापर करावा. धन्याची पावडर पाण्यात टाकून घेतल्याने मूत्रदाह, नेत्रदाह बरा होतो. कोथिंबिरीचा वापर डोळ्यांसाठी फायद्याचा असतो. दही हे थंड अजिबात नाही. त्यामुळे दह्याचे अतिसेवन करू नये. जिरे पावडर घालून रोज ताजे ताक जरूर घ्यावे. जेवणात हिरव्या मिरच्याचा वापर कमी करावा, त्याऐवजी लाल तिखट (मिरची पावडर) वापरावे. जेवणानंतर लगेचच पुन्हा अग्निसंपर्कात जाऊ नये. आहारात जलीय घटकांचा समावेश अधिक असावा. अपचन, बद्धकोष्ठता टाळण्यासाठी काळा मनुका १५ -२० रोज खाव्यात. जेवणात मूग, लाह्या, तूप, हळद, गाजर, दुधी पावडर, पडवडळ, फरसबी कढिलिंब, गहू, ओले खोबरे जरूर वापरावे. शिळे अन्न, साठवलेले पदार्थ, बेकरी उत्पादने टाळावीत. अशा पित्तक्षामक, थंड गुणाच्या पदार्थाचा वापर जरूर करावा.